कोल्हापूर - ‘‘चळवळी अनेक झाल्या, अनेक दिग्गजांबरोबर सर्वसामान्यांनी त्या चळवळीत योगदान दिले. त्यांचा संघर्ष ‘एका लोकलढ्याची यशोगाथा’ या पुस्तकात आहे. म्हणून चळवळीचे समाजशास्त्र लिहिताना हे पुस्तक समाजशास्त्राचे संशोधन साधन म्हणून उपयुक्त ठरेल. चळवळीचे वर्तनशास्त्र समजून घेण्यासाठीही या पुस्तकाचे मोल महत्त्वाचे आहे, म्हणून कार्यकर्त्यांनी पुस्तके लिहावीत,’’ असे मत ग्रामीण साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी येथे व्यक्त केले.
आजऱ्यातील सामाजिक संवेदना मंचतर्फे धरणग्रस्तांच्या चळवळीचे कार्यकर्ते संपत देसाई यांनी लिहिलेल्या ‘एका लोकलढ्याची यशोगाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन ग्रामीण साहित्यिक डॉ. राजन गवस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
संपत देसाई म्हणाले, की अगोदर पुनर्वसनानंतर धरण, असे सूत्र घेऊन धरणग्रस्तांचा लढा लढला. यात सर्वसामान्य व्यक्तींचा सहभाग होता. अनेक आंदोलनांना यश आले, तर कधी अपयश आले; मात्र त्यासाठी लोकांना मोठा संघर्ष करावा लागला. त्याचे तपशील कालौघात विस्मृतीत जाऊ नयेत, म्हणून धरणग्रस्तांच्या चळवळी शब्दबद्ध केल्या आहेत. नव्या पिढीला धरणग्रस्त व चळवळींच्या संघर्षाची ओळख व्हावी, अशी अपेक्षा आहे.
शब्द प्रकाशनचे यशोधन पाटील यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. यावेळी धनाजी गुरव, हुमायून मरसूल, ‘सकाळ’चे निवासी संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड, पत्रकार विजय चोरमारे यांनीही मनोगत व्यक्त केले. गेल ऑम्वेट उपस्थित होत्या.
माणसांचा आवाज समाजापर्यंत पोचत नाही; पण त्यांनी केलेल्या चळवळीमुळे धोरणे बदलावी लागली. मानवी जगण्यात सकारात्मक बदल घडविला, अशा सर्वसामान्य माणसांच्या लढ्याचा आवाज या पुस्तकात आहे.
- डॉ. भारत पाटणकर, श्रमिक मुक्ती दलाचे नेते
चळवळीचे सूत्र
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.