एसटी संपात अडली नातेवाइकांची भेट 

एसटी संपात अडली नातेवाइकांची भेट 

कोल्हापूर - "प्रवास करण्यासाठी एसटीचा प्रवास सुरक्षित आहे, एसटी इच्छित स्थळी पोचविणार याचा विश्‍वास आहे, त्यामुळे एसटीनेच प्रवास करायचा आहे. म्हणून गेले बारा तास एसटी संप मिटून, गाड्या सुरू होण्याची वाट पाहतोय, दिवाळीसाठी गावाकडे निघालोय. नातवंडांची व आजीआजोबांची भेट होणार आहे; पण संपामुळे येथेच अडकून पडलोय...'' 
मध्यवर्ती बसस्थानकावर दोन दिवसांपासून अनेक प्रवासी थांबून आहेत, त्यांपैकीच एक गंगाधर पाटील, नंदुरबारला जाण्यासाठी निघाले. सोबत पत्नी, दोन मुले आहेत. त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, "थेट खासगी गाडी नंदुरबारला जात नाही, पुण्यापर्यंत जायचे; तर एकाचे एसटी भाडे 320 रुपये आहे. खासगी आरामगाडीने जायचे झाल्यास 600 मोजावे लागेल, दोघांचे तिकीट. एक वेळ पुण्यापर्यंत जाण्यासाठी बाराशे रुपये लागतील. पुण्यातून नाशिक व नाशिकमधून नंदुरबार असा तीन टप्प्यांत प्रवास आहे. नंदुरबारपर्यंत पोचण्यासाठी किमान तीन हजार सहाशे रुपये दोघांसाठी मोजावे लागतील. एका वेळचा प्रवास झाला, येतानाही संप मिटला नाही; तर येतानाही तेवढेच पैसे लागतील. असे सात हजार रुपये खर्च होतील. मुलांचे तिकीट खासगीवाले अर्धे घेत नाहीत. त्यांचीही रक्कम मोजावी लागेल, येता-जाता पंधरा हजार रुपये खर्च होतील.'' 

ते म्हणाले, ""यंदाच्या सणाचा प्रवास रद्द करता येणे मुश्‍कील आहे. गावाकडे आजी, आजोबा आहेत. त्यांना नातवंडांची ओढ आहे. त्यामुळे गावी जावेच लागते. संप आज मिटेल अशी शक्‍यता गृहीत धरून, आम्ही सायंकाळपर्यंत इथेच थांबणार आहोत. संप मिटला तर ठीक, नाही मिटला तर मात्र खासगी गाडीने जाण्याशिवाय पर्याय नाही. त्याची चिंता नाही; पण मुले-नातवंडांची व आजी, आजोबांची भेट होणार नाहीच, याची हुरहूर आहे.'' 

हायवेवर झुंबड... 
कावळा नाका, तावडे हॉटेल, उजळाईवाडी येथे भररस्त्यावर अनेक प्रवासी उभे आहेत. ते राज्य व महामार्गावरून जाणाऱ्या ट्रकला किंवा इतर प्रवासी गाड्यांना थांबविण्याचा प्रयत्न करतात; मात्र अनेक गाड्या प्रवासी भरून येत असल्याने त्यांत जागा मिळत नाही. एखादे वाहन थांबले, की त्यात बसण्यासाठी एका वेळी दहा-पंधराजणांची झुंबड उडते. 

नातेवाईक आजारी आहेत. माढा येथे जायचे आहे. एसटीने गेलो, तर ज्येष्ठ नागरिकाचा पास असल्याने अर्धे तिकीट आहे. आज थेट माढ्याला वाहन मिळणे मुश्‍कील आहे. इथून सांगोला व सांगोल्याहून बार्शी किंवा कुर्डूवाडी व तिथून माढा असा प्रवास करावा लागेल. एसटी बंद असल्याने प्रत्येक वेळी वाहन बदलावे लागेल, प्रत्येकाचे दुप्पट भाडे; त्यामुळे माढ्यापर्यंत पोचण्यासाठी हजार-बाराशे रुपये मोजावे लागतील. सोबत पत्नी आहे. सतत गाड्या बदलत जाणे मुश्‍कील आहे. 
- सीताराम काजवे, प्रवासी. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com