कृष्णा नदीतील उपसा बंदमुळे इचलकरंजीत पाणी टंचाई

कृष्णा नदीतील उपसा बंदमुळे इचलकरंजीत पाणी टंचाई

इचलकरंजी -  वादळी पावसामुळे येथील वीज पुरवठा खंडीत झाल्याने कृष्णा नदीतील पाणी उपसा बराच काळ बंद ठेवावा लागला. परिणामी याचा परिणाम शहरातील पाणी पुरवठ्यावर झाला. पाणी टंचाईची समस्या त्यामुळे कायम आहे. किमान चार दिवसानंतर शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

शहराला कृष्णा आणि पंचगंगा नदीतून पाणी पुरवठा केला जातो. यामध्ये कृष्णा नदीतील पाण्यावर शहरातील पाणी पुरवठ्याची 90 टक्के भिस्त आहे. काल रविवारी सांयकाळी जोरदार वादळी पाऊस झाला. त्यामुळे कृष्णा नदीचे उपसा केंद्र असलेल्या मजरेवाडी येथील एक्‍स्प्रेस फिडरचा वीज पुरवठा दोन तासांहून अधिक काळ बंद पडला. त्यानंतर येथील फिल्टर हाऊसचा वीज पुरवठा रात्री 2 ते सकाळी 7.30 यावेळेत खंडीत झाला. त्यामुळे पाणी उपसा बंद ठेवावा लागला. आज पून्हा मजरेवाडी येथील सकाळी 9.30 पासून वीज पुरवठा खंडीत झाल्याने पाणी उपसा पूर्णता बंद ठेवण्यात आला होता. 

दुसरीकडे पाण्याचा प्रवाह थांबल्यामुळे पंचगंगा नदीतून होणारा पाणी उपसा पालिकेने खरबदारीचा उपाय म्हणून आठ दिवसांपूर्वी बंद केला होता. त्यामुळे पाणी कपात करण्यात आली. नागरिकांना दोन ऐवजी तीन दिवसाआड पाणी देण्यात आले. मात्र धरणातून पाणी सोडल्यांने पंचगंगा पून्हा दुथडी वाहत आहे. त्यामुळे काल रविवार सांयकाळपासून पून्हा पंचगंगा नदीतून पाण्याचा उपसा सुरु केला आहे. यातून दिलासा मिळाला असला तरी वीज पुरवठा खंडी झाल्यामुळे कृष्णा नदीचा उपसा बंद ठेवावा लागला.

परिणामी शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होण्यास सुरुवात होत असताना वीज पुरवठा खंडी झाल्यामुळे पालिकेने पाणी वाटपाचे वेळापत्रकच कोलमडून पडले आहे. पालिका प्रशासनाकडून सातत्याने महावितरण बरोबर दिवसभर संपर्क सुरु होता. सांयकाळनंतर वीज पुरवठा सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होण्यास किमान आणखी चार दिवसांचा कालावधी लागण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

पंचगंगा नदीतून पाणी उपसा सुरु केला आहे. पण वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे कृष्णा नदीतील पाणी उपसा बंद राहिला आहे. वीज पुरवठा सुरु होताच पाणी उपसा करुन शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे.
 - अजय साळुंखे 

जल अभियंता, इचलकरंजी नगरपरिषद

पाण्याची तीव्र टंचाई
शहरात अनेक भागात पाच दिवसानंतरही पाणी आलेले नाही. त्यामुळे नागरिकांना अन्य पर्याय शोधावे लागत आहे. ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण कण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. पाण्यासाठी शुध्द पेय जल केंद्रावर नागरिकांची गर्दी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com