आजरा : सेवानिवृत्तीनंतर अनेक जण निवांतपणे जीवन जगत रहातात. कोणतेही व्याप नकोत अशीच सर्वांची भावना असते. पण होनेवाडीतील सेवानिवृत्त पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांने आपल्या शेतात शेततळे उभारून 40 एकर कोरडवाहू क्षेत्राला पाणी पुरवले आहे. सायफन पध्दतीने शेतीला पाणी मिळाल्याने गावातील अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ होत आहे. बारमाही ऊस पिकाबरोबर उन्हाळी पिक शेतकरी घेत आहेत. शेतीमध्ये आदर्श पायंडा पाडण्याचा तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
आजरा-महागाव रस्त्यावरील होनेवाडी हे कोरडवाहू शेतीचे गाव. गावाला नदी नसल्याने शेतीला पाण्याची सोय नव्हती. पाटबंधारे विभागात अभियंता या पदावर कार्यरत असलेले शंकर हरी पाटील यांना अडचण लक्षात आली. त्यांनी पाण्याचे महत्व ग्रामस्थांना पटवून दिले. डोंगर माथ्यावर पाटील शेतात त्यांनी वीस लाख लिटर क्षमतेचे शेततळे उभारले.
हिरण्यकेशी नदीतील पाणी तीन किलोमीटरहून मोटरपंपाच्या साह्याने जलवाहिनीद्वारे शेततळ्यात टाकले आहे. हे पाणी सायफन पध्दतीने जवळपास 40 एकर शेतीला पुरवले आहे. त्यातून पडीक असलेली एक पिकी कोरडवाहू शेती सिंचनाखाली आली. गवताळ व पडीक शेतीही लागवडीखाली येवून अनेक शेतकऱ्यांनी उसासह व उन्हाळी पिक घेवू लागली आहेत. शेतकऱ्यांनी पाण्याची बचत करावी व अधिकाधिक उत्पादन शेतीतून घ्यावे याबाबत ते आग्रही आहेत. भविष्यात शेतीला जोडधंदा म्हणून तळ्यातून माशांचे उत्पादन घेण्याचा त्यांचा मानस आहे.
तरूणांनी शेतीकडे वळावे
गावात पाण्याचा कोणताही स्त्रोत नव्हता. त्यामुळे सिंचन योजना राबविली. ठिबक सिंचनद्वारे सव्वा एकरावर ऊस घेतला व उत्पादन चांगले आहे. तरूणांनी शेतीकडे वळावे व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न आहेत.
- शंकर हरी पाटील, होनेवाडी, आजरा
संपादन - सचिन चराटी
kolhapur
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.