कोल्हापूर : ‘उत्तर’च्या राजकारणात मालोजीराजे सक्रिय

महाविकास आघाडीच्या नेत्यांची धाकधूक वाढली
मालोजीराजे छत्रपती
मालोजीराजे छत्रपतीSakal

कोल्हापूर - विधानसभेच्या २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर राजकीय अज्ञातवासात गेलेले माजी आमदार मालोजीराजे छत्रपती हे पुन्हा एकदा कोल्हापूर उत्तरच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. उत्तरच्या पोटनिवडणुकीतील निकालानंतर त्यांनी काढलेली स्वतंत्र रॅली, त्यातील जल्लोष आणि अलीकडे शहरातील काही प्रमुख कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती पाहता ते पुन्हा एकदा मैदानात उतरण्याची शक्यता आहे. परिणामी ‘महाविकास’च्या नेत्यांची धाकधूकही त्यामुळे वाढली आहे. मालोजीराजे हे त्यावेळच्या कोल्हापूर शहरमधून काँग्रेसच्या तिकिटावर २००४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते. तत्पूर्वी ते राष्ट्रवादीकडून इच्छुक होते. काँग्रेस, राष्ट्रवादीनेही निवडणूक एकत्र लढवली. ही जागा काँग्रेसला गेल्याने एका रात्रीत मालोजीराजे यांचा काँग्रेस प्रवेश झाला आणि ते विजयी झाले. २००९ च्या निवडणुकीत मात्र त्यांचा त्यावेळी नवख्या असलेल्या माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून पराभव झाला. २०१४ ला त्यांनी उमेदवारीसाठी फारसी उत्सुकता दाखवली नसल्याने काँग्रेसने सत्यजित कदम यांना उमेदवारी दिली.

२०१९ मध्ये काँग्रेसकडून ते इच्छुक होते. आपल्याला किंवा पत्नी मधुरिमाराजे यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते; पण त्यात ताकद नव्हती. म्हणून काँग्रेसने उद्योजक कै. चंद्रकांत जाधव यांना उमेदवारी दिली. कै. जाधव यांचे अकाली निधन झाल्याने या मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली. त्यात मालोजीराजे कै. जाधव यांच्या पत्नी श्रीमती जयश्री यांच्या प्रचारात केवळ सक्रिय नव्हते, तर मैदानातच उतरले होते. या निवडणुकीत श्रीमती जाधव यांचा विजय झाला आणि मालोजीराजे हेच ‘किंगमेकर’ म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासह मधुरिमाराजे यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढून ‘उत्तर’चे ‘उत्तर मालोजीराजे’ हेच दाखवून दिले. किंबहुना तसे फलक त्यांच्या रॅलीत दिसले होते. दोन दिवसांपूर्वी मंगळवार पेठ शिवजयंती उत्सव समितीने शहरात काढलेल्या रॅलीतही त्यांचा सहभाग दिसला. या पार्श्‍वभूमीवर ते २०२४ च्या निवडणुकीतील काँग्रेसच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार असतील.

आघाडी होणार का हाच प्रश्‍न

राज्यात सध्या शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी अशा तीन पक्षांचे सरकार आहे. विधानसभेला हे तिन्हीही पक्ष एकत्र लढणार का नाही, याविषयी संभ्रमावस्था आहे. राज्याचा विचार करता तिन्हीही पक्षांना स्वतंत्र लढण्याशिवाय पर्याय नाही. तसे झाल्यास मालोजीराजे यांना उमेदवारी मिळणार की पुन्हा जाधव यांना हे आताच सांगणे अशक्य आहे. त्यात ऐनवेळी दुसऱ्या एखाद्याच्या गळ्यातही उमेदवारीची माळ पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मालोजीराजे यांनी मात्र सुरू केलेल्या तयारीमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचीच धाकधूक वाढणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com