भिलवडी- स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या घेराव आंदोलनानंतर येथील कृषिपंपाची वीज कनेक्शन तोडणे थांबवून पूर्ववत जोडण्याचे आश्वासन शाखा उपअभियंता सौ. उज्ज्वला बडेकर यांनी दिले.
महावितरण कंपनीने थकित वीज बिलापोटी या महिन्यात कनेक्शन तोडण्याची मोहीम उघडली. त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात होता. सायंकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते व शेतकरी येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात जमले.
त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे थकित बिलापोटी कृषिपंपाचे कनेक्शन तोडू नये, अशा आशयाचे पत्र अधिकारी सौ. बडेकर यांना दाखविले. जोवर कनेक्शन जोडत नाही, तोवर येथून हलणार नसल्याचा पवित्रा घेतला. काही शेतकऱ्यांच्या उसाची अद्याप तोड झाली नाही. गेलेल्या उसाची बिले कारखान्याकडून वेळेत मिळत नसल्याचे सांगत कनेक्शन पुन्हा जोडण्याबाबत आग्रह धरला.
श्री. राजोबा म्हणाले, ‘‘सध्या शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. १२ डिसेंबरला महावितरणचे वरिष्ठ अधिकारी वीज कनेक्शन तोडू नये, असा लेखी आदेश काढतात. त्याला केराची टोपली दाखवली जाते. येथील कार्यालयाने कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू केली आहे,
ती अन्यायी आहे. कारखाने नियमाप्रमाणे चौदा दिवसांत ऊस बिले देत नाहीत, त्यांना महावितरण विचारत नाही. स्वाभिमानीच्या दणक्यानंतर ती पूर्ववत जोडण्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली आहे, पुन्हा तोडल्यास संघटना आक्रमक आंदोलन करेल.’’ दरम्यान, यासंदर्भात येथील महावितरण कंपनीच्या अधिकारी सौ. बडेकर यांना फोन व मेसेज केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.