
आवक घटल्याने फळे महागली
13787
गडहिंग्लज : बाजारात केळीची खरेदी करताना ग्राहक. (अमर डोमणे : सकाळ छायाचित्रसेवा)
आवक घटल्याने फळे महागली
समुद्री माशांचे दर तेजीत; कांदा, लसूण, बटाट्याचे दर स्थिर, चिंचेचा भाव कायम
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : येथील फळबाजारात आवक घटल्याने सर्वच फळे महागली आहेत. सरासरी २० ते ३० टक्क्यांनी दर वाढले. मच्छी बाजारात समुद्री माशांची आवक घटल्याने दर तेजीत आहेत. सुमारे ५० टक्के आवक कमी झाली आहे. चिचेंचा भाव कायम आहे. भाजी मंडईत वाढत्या उन्हाळ्यामुळे गेल्या महिनाभरापासून पालेभाज्या, फळभाज्या कमीच आहेत. कांदा, लसूण, बटाट्याचे दर स्थिर आहेत. जनावरांच्या बाजारात मागणी घटल्याने उलाढाल मंदावली आहे.
सांगली जिल्ह्यातून येणाऱ्या द्राक्षांचा हंगाम संपत आला आहे. परिणामी गेल्या महिन्याच्या तुलनेत ७० टक्के आवक कमी झाली आहे. त्यामुळे दरही वाढले आहेत. किलोचा ८० रुपये असा दर आहे. सफरचंदाचे दर तर गेल्या दोन महिन्यांपासून चढेच आहेत. १५० ते २०० रुपये अशी विक्री सुरू आहे. संत्री सदुश्य माल्टा, डाळींब, पेरू १२० ते १५० रुपये किलो आहेत. स्थानिक पेरूंची आवक कमी असून थायलंडचा मोठा आकाराचा पेरूची आवक टिकून आहे. कलिंगडला वाढत्या उष्म्यामुळे मागणी असून, आकारानुसार ३० ते १०० रुपयापर्यंत दर आहेत. कोकणातील हाफूस आंब्याची आवक सुरू असून, ९०० ते १२०० रुपयापर्यंत डझनाचा दर असल्याचे विक्रेते अमित रणदिवे यांनी माहिती दिली. पपई, केळीचा २० ते ५० रुपये दर आहे.
मच्छी बाजारात समुद्री माशांची आवक ५० टक्क्यांनी कमी झाली आहे. परिणामी दर वधारल्याचे विक्रेते आसिफ बोजगर यांनी सांगितले. तुलनेत तलावातील माशांची आवक चांगली आहे. हिरण्यकेशी नदीतील माशांची आवकही धऱणाचे पाणी सोडल्याने कमी आहे. दर असे सुरमई १०००, बांगडा २४०, रावस ५००, प्रॉझ ६००, पापलेट १२००, कटला २४०, राऊ २०० रुपये किलो. चिंचेचा हंगाम बहरला आहे. ग्रामीण भागातील आवकेत लक्षणीय वाढ असून, २० ते ४० रुपयापर्यंत किलोचा दर आहे.
पालेभाज्या, कोंथिबिर १५ ते २० रुपये पेंढी असून, गवारीचा दरानेही उसळी घेतली आहे. गवार ८० रुपये किलो आहे. फळभाज्या सरासरी ६० ते ७० रुपये किलो आहेत. केवळ कोबी, टोमॅटोचे भावच कमी आहेत. हिरवी मिरची ८० ते १०० रुपये किलो असा दर टिकून आहे. जनावरांच्या बाजारातही उन्हाळ्यामुळे आवक कमी असून, दरही अधिक आहेत. म्हशींची ५० पेक्षा अधिक आवक होऊन २५ ते ८० हजार रुपयापर्यंत दर होते. शेळ्या मेंढ्याची १०० हून अधिक आवक होऊन ५ ते १५ हजारांपर्यंत दर होते. तुलनेत बैलजोड्यांची आवक जेमतेम आहे.
-------------
चौकट
खजूरला मागणी
मुस्लिम बांधवांचा पवित्र मानला जाणारा रमजान महिना सुरू झाला आहे. रोजे सोडण्यासाठी खजूरचा वापर वाढल्याने मागणी वाढली आहे. बाजारात विविध प्रकारचे खजूर उपलब्ध असून, लाल खजूर १०० ते १५०, तर काळी खजूर २५० ते हजार रुपये किलो असा दर असल्याचे विक्रेते निखिल इंगळे यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..