
केळोशी बंधाऱ्याचा शुभारंभ आमदार आबिटकर
00953
कोल्हापूर पद्धतीच्या बंधारा
कामाचा केळोशी बुद्रुकला प्रारंभ
धामोड, ता. २८ : राधानगरी तालुका पाण्याचा खजिना आहे. येथील जलाशयामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली असून हरितक्रांती अवतरली आहे. प्रकल्पाच्या कामांना निधी कमी पडू देणार नसल्याचे प्रतिपादन आमदार प्रकाश आबीटकर यांनी केले. ते केळोशी बुद्रुक (ता. राधानगरी) येथे लोंढानाला लघुपाटबंधारे प्रकल्पावर १९ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या प्रारंभी बोलत होते. माजी सरपंच के. एल. पाटील अध्यक्षस्थानी होते.
आमदार आबिटकर म्हणाले, ‘परिसराने विधानसभेला मला प्रचंड मताधिक्य दिले. परिसरात निधी कमी पडू देणार नाही. येथे विकासाचे नवे पर्व सुरू करणार आहे.’ कार्यक्रमास बाळासाहेब नवणे, संदीप मगर, आशिन नवने, सरपंच राऊ कांबळे, गणपती पाटील, कृष्णा पाटील, कृषी सहायक सुतार उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार एस. टी. पाटील यांनी मांडले.
यावेळी प्रकल्पग्रस्तांनी समस्या आमदार आबिटकरांसमोर मांडल्या. प्रकल्पासाठी जागा देऊनही शासनाने प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवलेल्या नसल्याचे निदर्शनास आणून दिल्या. ‘आता तुम्ही दमताय का मी दमतोय तेच बघूया’ असे आमदार आबिटकरांनी सांगितले.
५०३ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली
बैलगौड नावाच्या ओढ्यावर लोंढा-नाला प्रकल्प पूर्णत्वास येत आहे. सहा-सात वर्षांपासून प्रकल्पात पाणी अडवून त्याचा शेतीच्या पाण्यासाठी वापर करायला सुरवात केल्याने हरितक्रांती झाली आहे. यामुळे ५०३ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले.