
धामणी नदी कोरडी पिके वाळू लागली
01101
....
धामणी नदीचे पात्र कोरडे
कोनोली तर्फ असंडोलीतील चित्र; शेकडो एकरांतील ऊस वाळू लागला
धामोड, ता. २९ : कोनोली तर्फ असंडोली (ता. राधानगरी) येथील धामणी नदी कोरडी पडल्याने शेतीचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाण्याविना शेकडो एकरांतील ऊस शेती वाळू लागली आहे. येथील शेतकरी वळीव पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
धामणी नदीवरील धामणी प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. धामणी नदीवर शेतीला पाण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांना कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना समांतर स्वखर्चाने मातीचे बंधारे घालावे लागतात. बंधाऱ्याला सुमारे अडीच लाख रुपये खर्च येत असून किमान अर्धा टीएमसी पाणीसाठा अडवला जातो. राधानगरी, गगनबावडा व पन्हाळा तालुक्यातील ४८ गावांना अशा पद्धतीचे नऊ मातीचे बंधारे घालावे लागतात. सध्या बावेली, कोनोली, पखालीवाडी येथील बंधारे पाण्याविना कोरडे पडले आहेत. त्यामुळे या परिसरात शेतीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे.
येथील शेतकऱ्यांनी धामणी नदीत जेसीबीच्या सहाय्याने पाण्यासाठी पंचवीस फूट खोदाई केली आहे. पाण्यासाठी किमान २० हजार रुपये खोदाईसाठी खर्च शेतकऱ्यांनी केला आहे. तरीदेखील पुरेसे पाणी मिळत नसल्याने शेतीचा प्रश्न ‘आ’ वासून उभा राहिला आहे.
...
‘मार्च महिन्यातच यावर्षी बंधाऱ्यातील पाणी पातळी खालावली होती. सध्या धामणी नदी कोरडी पडली आहे . त्यामुळे उसाची शेती पाण्याविना वाळू लागली आहे . वळीव पाऊस आठवड्याभरात झाला तरच शेतातील पिक वाचेल अशी स्थिती आहे.
- प्रकाश पाटील, शेतकरी
01100, 01101