शब्दालंकारांनी रंगली काव्यमैफल

शब्दालंकारांनी रंगली काव्यमैफल

79166
इचलकरंजी : येथे काव्यसंध्या कवीसंमेलनात राज्यातील युवा निमंत्रित कवींनी कविता सादर केल्या.
----------------
शब्दालंकारांनी रंगली काव्यमैफल
राज्यस्तरीय युवा कवी संमेलन; इचलकरंजीत रसिकांची दाद
इचलकरंजी, ता. ३० : कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचणाऱ्याने, उभा रस्ता बदलला रे तिच्या एका इशाराने...मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा अशा अनेक कवितांनी वस्त्रनगरीची संध्याकाळ शब्दांच्या गोतावळ्यात रंगली. कवींनी एकापेक्षा एक दर्जेदार कविता सादर करत रसिकांची भरभरून दाद मिळवली. शब्दालंकारांनी भरलेली ही मैफल कवितेच्या सर्वच प्रकारांना स्पर्श करत उत्तरोत्तर रंगत गेली. मांडणाऱ्‍या वैविध्यपूर्णतेने नटलेल्या कवितांचा रसिकांनी अस्सल साहित्यानंद लुटला.
सृजन सह्याद्री फौंडेशन, दत्ताजीराव कदम एएससी महाविद्यालय, प्रतिरंग प्रॉडक्शन, लोकराजा ऊर्जामैत्री - काव्यांगण परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच ‘काव्यसंध्या’ हे निमंत्रितांचे राज्यस्तरीय युवा कवी संमेलन श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृहात झाले. अनंत राऊत (अकोला), रोहित शिंगे (इचलकरंजी), ध. सु. जाधव (हिंगोली), डॉ. स्वप्नील चौधरी (सायगाव), विश्वास पाटील (राधानगरी), भैरवी चितळे (मुंबई), रमीजा जमादार (भुदरगड), अपूर्व राजपूत (सोयगाव) यांनी कविता सादर केल्या. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‍घाटन झाले. प्राचार्य डॉ. अनिल पाटील, पोलिस अधिकारी महादेव वाघमोडे, विकास अडसूळ, मदन कारंडे, राजीव आवळे, राहुल खंजिरे, ॲड. सचिन माने, दशरथ माने, उदयसिंह पाटील, राजू आलासे, प्रमोद खुडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. स्वप्नील चौधरी यांच्या गण्या या बहारदार कवितेने काव्य संमेलनाला सुरुवात झाली. इचलकरंजीचे त्यांनी कवितेतून केलेल्या वर्णनाला रसिकांनी भरभरून दाद दिली. अपूर्व रजपूत यांच्यानंतर नंतर गझलेने गुलाबी हशा पिकवला. कवी अनंत राऊत यांच्या कशाला वाचला चेहरा यांसारख्या कवितेने रसिकांना प्रेमाच्या दुनियेत नेले. भोंगा या कवितेतून राजकीय वर्तमानावर मार्मिक भाष्य केले. रमिजा जमादार यांचा मामाचा गाव आणि मुंबईच्या भैरवी चितळे यांच्या पाऊस या दोन्ही गेय कवितांनी मंत्रमुग्ध केले. विश्वास पाटील यांच्या शहर गझलेने कोरोना काळातील नात्यांमध्ये दुरावलेल्या गंभीर परिस्थितीवर भाष्य केले. हिंगोलीच्या ध. सू. जाधव यांनी बहारदार प्रेम कवितांनी रसिकांना हसवले. कवी प्रा. रोहित शिंगे यांच्या सखी माहेरी आलेली या कवितेने रसिकांना प्रेम विश्वात नेले. प्रा. शिंगे यांनी निवेदनाने रसिकांना काव्यसंमेलनात खिळवून ठेवले. कवी राऊत यांच्या मैत्री या समारोपाच्या कवितेला रसिकांनी उभे राहून दिली.
काव्य संमेलन यशस्वी करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक ओंकार काकडे, मेजर प्रा. मोहन विरकर, प्रतीक साठे, सारंग भांबुरे, विजयानंद लंबे, अंकुश पोळ, दिग्विजय म्हामणे, आविष्कार कांबळे, सुनील दळवी आदींनी परिश्रम घेतले. स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी केले. आभार ओंकार काकडे यांनी मानले.
------
अन् बाल्कनी उघडावी लागली
राज्यातील युवा कवींचे काव्यसंमेलन हा कार्यक्रम शहरात पहिल्यांदाच प्रा. रोहित शिंगे यांच्या संकल्पनेतून आयोजित केला. काव्यसंमेलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. संमेलन सुरू होण्याआधीच नाट्यगृह भरले होते. गर्दी वाढल्याने कोरोनानंतर पहिल्यांदाच या कार्यक्रमाला बाल्कनी उघडावी लागली. बाल्कनी उघडूनही जागा अपुरी पडल्याने शेकडो रसिकांनी उभारूनच कवितांचा आनंद घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com