इचलकरंजीत हाफ तिकीटला ‘फुल्ल’ प्रतिसाद

इचलकरंजीत हाफ तिकीटला ‘फुल्ल’ प्रतिसाद

05905
इचलकरंजी : महिला सन्मान योजना सुरू झाल्यानंतर येथील बसस्थानकावर महिलांची वर्दळ वाढली आहे.

इचलकरंजीत हाफ तिकीटला ‘फुल्ल’ प्रतिसाद
महिला सन्मान योजना; आठ दिवसात ९८ हजार जणींचा प्रवास
इचलकरंजी, ता. २६ : काय ते तिकिटाचे पैसे जातील, तुम्हीच जाऊन या’, असे म्हणून बऱ्याच प्रसंगांमध्ये पाऊल मागे घेणाऱ्या महिलांनी आता सन्मानाने पाऊल पुढे टाकायला सुरुवात केली आहे. हाफ तिकीटला फुल्ल प्रतिसाद मिळत असून महिला सन्मान योजना सुरू केल्याने लालपरीमध्ये भलतीच गर्दी वाढली आहे. इचलकरंजी विभागातून बसेसने‎ विविध मार्गांवर आठ दिवसात ९८ हजार १२४ महिलांनी प्रवास केला आहे. योजनेत इचलकरंजी विभाग कोल्हापूर जिल्ह्यात नंबर वनवर आहे.
खासगी बस आणि अन्य पर्याय प्रवासासाठी उपलब्ध झाल्याने एसटीचा खडखडाट पाहता प्रवासी एसटीला दुरूनच टाटा करीत होते. त्यामुळे अनेक बसेस रिकाम्या धावत असल्याचे चित्र होते. मात्र राज्य सरकारच्या महिला सन्मान योजनेच्या निर्णयामुळे एसटीत महिला प्रवाशांची संख्या वाढली आणि एसटीला पुन्हा सुगीचे दिवस येऊ लागले आहेत. महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यामध्ये महिलांना ५० टक्के सवलत मिळणाऱ्या या योजनेला १७ मार्चपासून सुरुवात झाली. या योजनेची माहिती सर्वत्र पसरल्यानंतर दुसऱ्या दिवशी येथील बसस्थानकावर महिलांची गर्दी वाढल्याचे दिसून आले. एकट्या इचलकरंजी आगारातून पहिल्या चार दिवसात तब्बल ४१ हजार ८७४ महिलांनी प्रवास केला. त्यामुळे आगाराला केवळ या योजनेतून ७ लाख २६ हजार ७८६ रुपयांचा महसूल मिळाला. त्यानंतर पुढील चार दिवसांत महिला प्रवासी संख्येत तब्बल ५६ हजारांच्या घरात वाढ झाली. आता ही संख्या ९८ हजारांवर पोहोचली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक इचलकरंजी विभागातून एसटी प्रवासात महिलांना सन्मान मिळाला आहे. एकूण जिल्ह्याच्या तुलनेत इचलकरंजी विभागाची प्रवासी संख्या १५ टक्के तर उत्पन्न १४ टक्के आहे. साध्या गाड्यांसह शिवशाही बसगाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढल्याचे चित्र आहे. साध्या बसच्या भाड्यापेक्षा शिवशाही बसचे सवलतीचे भाडे कमी लागत असल्याने लांब पल्ल्याच्या मार्गावर महिला शिवशाहीला प्राधान्य देत आहेत. पन्नास टक्के तिकिटानुसार इचलकरंजीत एसटीला १७ लाख ५१ हजार ८५६ रुपयांचा महसूल मिळाला असून उर्वरित पन्नास टक्के रक्कम राज्य शासन देणार आहे.
-------------
दररोज अकरा हजार महिलांचा प्रवास
इचलकरंजी विभागातून लांब पल्ल्यावर कमी स्थानिक मार्गावर महिलांचा प्रतिसाद अधिक आहे. प्रवासी संख्येच्या एकूण दैनंदिन सरासरी आकडेवारीचा विचार करता दररोज ११ हजार महिला एसटीतून प्रवास करत आहेत. याचा थेट फटका खासगी वाहतुकीला बसला असून जिल्हाअंतर्गत एसटी फेऱ्या गतिमान झाल्या आहेत.
----
ग्रामीण बसफेऱ्यांचा तुटवडा
सवलतीच्या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिला मोठ्या प्रमाणात एसटीकडे वळत आहेत. मात्र एसटीच येत नसल्याने महिलांमध्ये नाराजी आहे. वर्षभर ग्रामीण भागातील इचलकरंजी आगाराने ३५ टक्क्याहून अधिक फेऱ्या बंद केल्या आहेत. या फेऱ्या पूर्ववत झाल्यास खऱ्या अर्थाने एसटीची ही महिला सन्मान योजना शेवटच्या महिलेपर्यंत पोहोचू शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com