
कमी दरात औषधे सरकारचे धोरण
06338
इचलकरंजी : मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेत गुरुवारी पाचव्या दिवशी प्रा. डॉ. मृदुला बेळे यांचे ‘औषध न लगे मजला’ या विषयावर व्याख्यान झाले.
लोगो ः मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमाला
कमी दरात औषधे सरकारचे धोरण
प्रा. डॉ. मृदुला बेळे; ‘औषध न लगे मजला’ विषयावर व्याख्यान
इचलकरंजी, ता. १९ : भारत देशात औषध निर्मितीबाबतच्या पेटंट कायद्यामुळे औषधाच्या किंमती कमी आणि योग्य आहेत. त्यामुळे भारत जगालाही स्वस्त दरात औषध पुरवणारा देश आहे. याचा अभिमान प्रत्येक भारतीयाला असायला हवा. सर्वसामान्य लोकांना औषधे कमी दरात मिळायला हवीत, हे भारत सरकारचे पुर्वीपासून धोरण आहे, अशी माहिती औषध निर्माणशास्त्र संशोधक व लेखिका प्रा. डॉ. मृदुला बेळे (नाशिक) यांनी दिली.
मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेत पाचव्या दिवशी ‘औषध न लगे मजला’ या विषयावर त्यांनी विचार मांडले. लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह प्रोसेसर्सचे प्रतिनिधी मधुकर पाटील यांच्याहस्ते शिवप्रतिमा पूजन केले. प्रा. डॉ. बेळे म्हणाल्या, ‘औषध निर्मिती प्रक्रिया, त्याचे पेटंट, मान्यता यामागील अर्थकारण व समाजकारण या सर्व गोष्टींचा परस्पर संबंध असतो. सध्या बऱ्याच लोकांना वयाच्या पस्तीशीनंतर जीवनशैलीमुळे येणारे विविध आजार होतात आणि त्यासाठी कायमस्वरूपी औषधेही घ्यावी लागतात. अशा औषध निर्मितीविषयी आपण जाणून घेणे आवश्यक आहे.’
त्या म्हणाल्या, ‘एकूणच या औषध निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन, प्रत्येक टप्प्यावर पेटंट, मान्यता, आदी प्रचंड खर्च असल्याने साधारणपणे नवीन औषधांचे संशोधन युरोप अमेरिकेत होताना दिसते. पेटंट कायद्यानुसार नवीन औषध निर्मितीला वीस वर्षे संरक्षण पुरवले आहे. ही वीस वर्षे फक्त पेटंटधारक कंपनी या नवीन औषधांचे उत्पादन करू शकते. ही मुदत संपल्यानंतर इतर कंपन्या अशा प्रकारचे औषध जेनरिक औषध म्हणून निर्माण करू शकतात."
आज भारत हा जगातील तीन नंबरचा औषध उत्पादक देश आहे. भारतातून मोठ्या प्रमाणात औषधे निर्यात केली जातात. मात्र भारतात फक्त तीन ते चार टक्के हेल्थ इन्शुरन्स घेतला जातो आणि भारतात जीडीपीच्या अत्यंत अल्प असा खर्च औषध विषयक संशोधनासाठी केला जातो, यात बदल व्हायला हवा." अशीही माहिती त्यांनी दिली. संतोष आबाळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. चित्कला कुलकर्णी यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. संजय होगाडे यांनी सूत्रसंचालन केले.
----------
सरकार बदलली, कायदा नाही
भारतात अनेकदा सरकारे बदलली पण औषध निर्मिती कायदा मात्र बदललेला नाही. त्यामुळे भारत देशात औषधे स्वस्त आहेत. पाश्चात्य औषध निर्मिती उद्योगाचा आपल्या पेटंट धोरणावर प्रचंड दबाव असला तरी भारत देश याबाबत नेहमीच कणखर धोरण ठेवून आहे. भारताच्या पेटंट कायद्यातील तरतुदी विशेषतः सेक्शन ३ डी मुळे भारतातील औषध निर्मिती उद्योगाला सुरक्षा प्राप्त झाली आहे, असे प्रा. डॉ. बेळे यांनी सांगितले.