भाजीपाला उत्पादकांसाठी ठोस धोरणाची गरज

भाजीपाला उत्पादकांसाठी ठोस धोरणाची गरज

भाजीपाल्यावर नांगर फिरवतानाचा संग्रहित फोटो वापरणे
------------
भाजीपाला उत्पादकांसाठी ठोस धोरणाची गरज
वाढता उत्पादन खर्च, बेभरवशाचा दर, वातावरणाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना फटका
जयसिंगपूर, ता. १२ : भाजीपाला उत्पादनाचा वाढता खर्च, बेभरवशाचा दर, वातावरणाचा लहरीपणा आणि भाजीपाल्याचे वाढते उत्पादन याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळेच भाजीपाल्याच्या उभ्या पिकांवर नांगर फिरवावा लागत आहे. यातून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसत आहे. त्यामुळे शासन भाजीपाला उत्पादकांसाठी ठोस धोरण आखणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
राज्यभरात गतवर्षी झालेल्या पावसामुळे उन्हाळ्यात मुबलक पाणी साठा झाला आहे. तालुक्यासह सर्वत्र मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची पिके घेतली आहेत. त्याचबरोबर ऊस तुटल्यानंतर अनेक शेतकऱ्‍यांचे कोबी, फ्लॉवर, टोमॅटोचे अतिरिक्त उत्पन्न झाल्याचे चित्र सध्या पश्चिम महाराष्ट्रात दिसत आहे. कोबीला एक ते दोन रुपये दर मिळत असल्याने शेतकरी चांगला जोमात आलेला कोबी खर्च परवडेना म्हणून काढला जात नाही. तर दुसरीकडे दर नाही त्यामुळे शेतकरी उभ्या कोबीवर नांगर फिरवून पीक नष्ट करीत आहेत.
उन्हाळ्याला सुरुवात झाली असून भाजीपाल्याला अपेक्षित दर मिळणे गरजेचे आहे. मात्र उलट परीस्थिती असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. जयसिंगपूर बाजार समितीच्या मार्केटमध्ये गुरुवारी (ता. ९) कोबी ३ रुपये, फ्लॉवर १५० ते २०० रुपये (१२ ते १५ किलो पोते), भेंडी ४० ते ५०, गवार ५० ते ८०, दोडका ३५ ते ४०, कारली ३० ते ३५, बिनीस ४५ ते ५०, बीट २ ते ३ प्रति नग, काटा वांगी ३० रुपये व इतर वांगी ५ ते १० रुपये, मुळा २ ते ३ रुपये, मिरची ४० ते ५० रुपये, ढबू ३५ ते ४० रुपये, टोमॅटो १५ ते २० रुपये, काकडी ३० ते ३५ रुपये दर लागत असल्याची माहिती व्यापारी शब्बीर मुजावर यांनी दिली.
दरम्यान, दराच्या चढाओडीत भेंडी, गवार, मिरची आणि ढबूचा दर चढा असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्याचबरोबर इतर भाजीपाल्याचा दर कवडीमोल भावाने विक्री होत असल्याचे चित्र आहे. एकीकडे वाढती महागाई, खतांचे वाढते दर, कामगार खर्च, मशागत खर्च, वाहतूक असा एकरी लाखपर्यंत येत असताना चांगल्या पिकाला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकरी उभ्या पिकावर नांगर घालीत आहेत. त्याचबरोबर अतिरिक्त उत्पन्न, सर्वत्र भाजीपाला असे चित्र असल्याने सर्वच बाजारपेठेत दर कोलमडले असल्याचे दिसून येत आहे. यात मात्र शेतकरी भरडला जात आहे.
....

कर्नाटकच्या भाजीपाल्याची आवक
सध्या कर्नाटकातील घटप्रभा, गोकाक, मुडलगी, हारुगिरी, कुडची, चिक्‍कोडी, रायबाग यांसह परिसरातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा भागात उपलब्ध होत आहे. अशात कोल्हापूर, सांगली परिसरात उत्पादन होत असलेला भाजीपाला बाजारात आल्यानंतर त्याचे दर गडगडत आहेत.
....

अनेक शेतकऱ्‍यांनी ऊस तुटल्यानंतर भाजीपाल्याचे उत्पादन घेतले आहे. मुबलक पाणी व पूरक वातावरणामुळे पिकेही चांगली आली आहेत. मात्र मोठ्या बाजारपेठेत भाजीपाल्याचा दर गडगडले आहे. सध्या मुंबई मार्केटला वांगी, फ्लॉवर पाठविण्यात येतो. त्याला म्हणावा तितका दर नाही.

-अनंत भगाटे, अध्यक्ष, नांदणी भाजीपाला संघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com