सुट्ट्यांच्या हंगामात वाहतुकीची कोंडी भाग दोन (सुधारित)

सुट्ट्यांच्या हंगामात वाहतुकीची कोंडी भाग दोन (सुधारित)

रस्ता विभाजन; वाहतूक मात्र जुन्या मार्गावरून

कोल्हापूर- सांगली महामार्गः तमदलगे, उदगाव टोल नाक्यावर वाहनधारकांचे प्रबोधन गरजेचे

गणेश शिंदे: सकाळ वृत्तसेवा

जयसिंगपूर, ता.२६: कोल्हापूर- सांगली जुन्या महामार्गावर वाहतुकीची कोंडी तसेच महामार्गाला शहरातून होणारा विरोध लक्षात घेऊन तमदलगे, जैनापुर बायपासमार्गे नव्याने महामार्गाचे विभाजन करण्यात आले. मात्र अद्यापही थेट सांगलीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बायपास मार्गाने वळविण्यात आली नाहीत. परिणामी शहरातील वाहतुकीच्या कोंडीत यामुळे भर पडत आहे. जयसिंगपूर पोलिसांनी तमदलगे आणि उदगाव टोल नाक्यावर वाहनधारकांना प्रबोधन करून सूचना दिल्यास काही प्रमाणात कोंडी सुटू शकेल.
उदगांव पोलिस चेक नाका येथे कोल्हापूरहून सांगलीकडे येणारा बायपास मार्ग येतो. त्याचबरोबर पुन्हा कोल्हापूरहून जयसिंगपूरहून येणारा मार्ग उदगांव येथे येतो. तसेच उदगांव येथून शिरोळ, नृसिंहवाडी, चिंचवाड, अर्जुनवाड असे जाणारे मार्ग आहेत. उदगांव पुलाजवळ आल्यानंतर दोन पूल असूनही सकाळी नऊ ते बारा व सायंकाळी चार ते सात वाजेपर्यंत प्रचंड प्रमाणात वाहनांची संख्या असल्याने वाहतूक कोंडी होते. एकदा वाहतूक कोंडी झाली की ती तासभर निघत नाही.
या वाहतूक कोंडीवर जयसिंगपूर व सांगली ग्रामीण पोलिसांनी एकत्रित येऊन दगांव व अंकली येथे सकाळच्या सत्रात वाहतूक पोलिसांची नेमणूक करणे गरजेचे आहे. सध्या उदगांव येथे पोलिस असल्यामुळे कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करतात. नदी पलिकडे अंकली येथे सांगलीहून कोल्हापूरकडे येणारी वाहने व उदगांवहून पुढे मिरजेकडे जाणारी वाहने त्यामुळे अंकली येथील चौकात वाहतूक ठप्प होते.
....

चिंचवाड जोड रस्ता होणार कधी ?

कोल्हापूर- सांगली महामार्ग व रत्नागिरी- कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग याला जोड रस्ता म्हणून उदगांव-चिंचवाड-अर्जुनवाड-मिरज असा जोड रस्ता गृहित धरण्यात आला आहे. उदगांव येथे वाहतूक कोंडी झाल्यास मिरज, पंढरपूर व कर्नाटकात जाणारी सर्व वाहने उदगांव-चिंचवाडमार्गे मिरजकडे जातात.त्यामुळे वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होते. तर उदगांव-चिंचवाड-अर्जुनवाडपर्यंतचा रस्ता अरूंद असल्याने दोन मोठी वाहने या रस्त्यावरून ये-जा करू शकत नाही. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे.
....

शहरांतर्गत रस्ता रुंदीकरण गरजेचे

जयसिंगपूर शहरातील महामार्गावर वाहतुकीचा प्रचंड ताण आहे. शिवाय शहराच्या मध्यातून महामार्ग जात असल्याने सर्वच घटकांसाठी वाहतुकीचा वाढता ताण डोकेदुखी बनली आहे. याबरोबरच उदगाव येथेही अशीच परिस्थिती आहे. सुरक्षित वाहतुकीसाठी उदगाव टोल नाका ते तमदलगेदरम्यान रस्ता रुंदीकरणाची गरज आहे.
....

‘जयसिंगपूर शहरांतर्गत वाहतूक सोयीची आणि सुरक्षित व्हावी यासाठी रोटरी क्लबच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करू. आर्किटेक्ट अँड इंजिनियर्स असोसिएशनच्या माध्यमातून शहरातील वाहतुकीचे सर्वेक्षण करून जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला वाहतुकीचा आराखडा प्रभावीपणे राबविल्यास अंतर्गत वाहतूक आणि पार्किंगला शिस्त लागेल.

सागर आडगाणे,

माजी अध्यक्ष, रोटरी क्लब, जयसिंगपूर
...
उत्तरार्ध.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com