पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले

पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले

पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले
कृष्णेची पातळी नऊ फुटांवर; टंचाईग्रस्त गावांचे पावसाकडे लक्ष
जयसिंगपूर, ता. २५ : कृष्णेच्या पाण्याची पातळी नऊ फुटांवर आल्याने नदीकाठच्या अनेक गावातील पाणी पुरवठ्यावर याचा परीणाम झाला आहे. पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यावर मर्यादा आल्याने नदीकाठच्या गावांचे पावसाकडे लक्ष लागले आहे.
शेतीच्या पाण्यावर उपसाबंदी लागू केल्यानंतर शिरोळ तालुक्यातून विविध पक्ष, संघटनांनी याला तीव्र विरोध केला आहे. त्यापाठोपाठ नदीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाल्याने याचा अनेक गावांच्या पाणी पुरवठ्यावर परीणाम झाला आहे. दररोजच्या वेळेपेक्षा चाळीस टक्के पाणी पुरवठ्याच्या वेळेत कपात केली आहे. सांगली पाटबंधारे विभागाच्या मोजणीनुसार कृष्णेत केवळ नऊ फूट पाण्याची पातळी आहे. दीड महिन्याआधी यापेक्षाही कमी पाणी पातळीमुळे पात्रातील मासे मृत्युमुखी पडले होते. यानंतर प्रदुषणाविरोधात संताप व्यक्त केला होता. सांगली महापालिकेने स्वतंत्र तरतूद करत प्रथमच नदी प्रदुषणमुक्तीसाठी पाऊल उचलले आहे. येणाऱ्या काळात नदीकाठावरील गावांनीही भूमिका घेणे गरजेचे बनले आहे.
अवकाळी पावसाने एक-दोन वेळा हजेरी लावली असली तरी वाढत्या तापमानामुळे याचा नदीच्या पाणी पातळीवर फारसा फरक पडला नाही. अनिश्चीत पावसामुळे शेतीची तहानही भागली नसताना आता पिण्याच्या पाण्यावरही मर्यादा आल्या आहेत. नदीपात्रातच पाणी नसल्याने उपसा आणि पुरवठ्यावर याचा परिणाम झाला आहे. तालुक्यातील जुने दानवाडमध्ये काही दिवसांपासून पाणीटंचाई आहे. चार नद्यांच्या या गावाला पाणीटंचाई जाणवत असेल तर अन्य काही गावांची स्थिती याहून वेगळी नाही. नदी काठीच पाणीटंचाई भासत असल्याने शहरी भागालाही याच्या झळा बसणार आहेत.
....
उन्हाळ्यात पाणी पाणी करण्याची वेळ
पावसाळा महिन्यावर येऊन ठेपला आहे. पावसाळ्याबरोबल पुराची भिती नदीकाठच्या गावांमध्ये असते. पुराच्या काळात सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांची धावपळ सुरु असते. तर आता उन्हाळ्यात नदीपात्रात पाण्याअभावी पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे.
....
कोल्हापूर, सांगली, साताऱ्याचे केंद्र सांगलीत
पावसाळा तोंडावर असताना आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. सांगलीत या कक्षाची स्थापना करुन कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील नदीच्या पाणी पातळीवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. पुराच्या काळात या केंद्रातून नदी पात्रातील इशारा पातळी, धोका पातळीची माहिती मिळणार आहे.
....
अर्जुनवाड कृष्णा नदीकाठावर वसले आहे. गावाला मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा केला जात होता. मात्र धरणातील पाण्याच्या विसर्गावर मर्यादा आल्या आहेत. शिवाय नदी पात्रात पाण्याची पातळी खालावल्याने पाणी उपसा आणि पुरवठ्यावर मर्यादा आल्या आहेत. नदीपात्रात असणारे पाणीही मोठ्या प्रमाणात दुषित बनल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. अशा स्थितीत पावसाळा सुरु होणे हाच यावरील उपाय आहे.

-विकास पाटील, ग्रामपंचायत सदस्य, अर्जुनवाड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com