
कळे: महावितरणच्या अपुऱ्या वीज पुरवठयामुळे शेतकरी हैराण.
03060
कळे परिसरात
अपुरा वीजपुरवठा
कळे, ता. १९ : महावितरणच्या अपुऱ्या विद्युत पुरवठयाला परिसरातील शेतकरी कंटाळले आहेत. पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. याबाबत रघुनाथदादा शेतकरी संघटनेतर्फे महावितरणच्या कळे उपविभाग कार्यालयाला निवेदन दिले. मागण्यांची दखल घेतली नसल्यास असहकार करून वीज पुरवठ्यावर बहिष्कार टाकण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
निवेदनाप्रमाणे, महावितरण व्यवस्थित वीजपुरवठा करत नाही. ४४० ऐवजी २२० अशा कमी दाबाने वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे विद्युत मोटारी जळत आहेत. ट्रिप झाल्यास कित्येक तास विद्युतपुरवठा खंडित होतो. वेळापत्रकाप्रमाणे वीज बंद केली जाते. वीजपुरवठा पुन्हा सुरू झाल्यावर वाया गेलेला वेळ वेळापत्रकात पुन्हा वाढवून देणे आवश्यक आहे. कायमस्वरूपी वायरमन नसल्याने कंत्राटी वायरमनला सबस्टेशनमधून फिडर बंद करण्याचे परमिट मिळत नाही. रात्रपाळीत वीज खंडित झाल्यास वायरमन उपलब्ध नसल्याने रात्रीची वेळ वाया जाते. त्यामुळे रात्री वीजपुरवठा केल्यास कायमस्वरूपी वायरमनही द्यावा. अन्यथा विद्युत पुरवठ्यावर बहिष्काराचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी कुलकर्णी, युवा अध्यक्ष प्रतीक कुलकर्णी, तालुकाध्यक्ष बबन खाटांगळेकर, सचिव रुपेश कांबळे, अरविंद पोवार, बबन कुंभार, नवनाथ कुंभार, संदीप चौगले, विश्वनाथ पोवार, सागर वाळवेकर, विश्वजित देसाई, लक्ष्मण म्हामुलकर, बाळासाहेब पाटील, आश्विन वरुटेंसह
वाळोली फिडरवरील पोहाळे, वारनूळ, काटेभोगाव, वाळवेकरवाडी, वाळोली, कुंभारवाडीतील शेतकरी उपस्थित होते. उपकार्यकारी अभियंता सचिन पाटणकर, कनिष्ठ अभियंता प्राजक्ता पाटील यांनी निवेदन स्वीकारले.