
तिळवणी ग्रामपंचायतचा वीज कनेक्शनसाठी आमरण उपोषणाचा इशारा
तिळवणी ग्रामपंचायतीचा उपोषणाचा इशारा
कबनूरः तिळवणी (ता. हातकणंगले) येथील नळ पाणीपुरवठा योजनेसाठी नवीन वीज कनेक्शन जोडण्याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयासमोर १ मार्च रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा तिळवणी ग्रामपंचायतने निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांना दिलेला आहे. निवेदनात म्हटले आहे, तिळवणी गावच्या नवीन नळपाणीपुरवठा योजनेची सर्व कामे झालेली असून पंचगंगा नदीवरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जॅकवेलमध्ये मोटर पंप बसविण्यात आलेला आहे. मोटर पंप ठेवण्याकरिता जागा उपलब्ध असल्याचे पत्र तिळवणी गावास दिलेले आहे. या ठिकाणी व तिळवणी गावातील साठवण टाकीत जलशुद्धीकरण केंद्राकरिता नवीन वीज कनेक्शनची मागणी गेली दीड वर्षांपासून वारंवार संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून देखील थकबाकीमुळे टाळाटाळ करण्यात येत आहे. संबंधित थकबाकी ही चौदा गावांची मिळून आहे. एकट्या तिळवणी गावची नाही. त्यामुळे तिळवणी गावास तीन वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे.