
कागल : प्रस्तावित विकास आराखड्याला शेतकऱ्यांचा वाढता विरोध - उद्या उपोषण
कागलमध्ये प्रस्तावित विकास
आराखड्याला विरोध, आज उपोषण
कागल, ता. २१ : नगर परिषदेच्या प्रस्तावित विकास आराखड्याला विरोध होत आहे. अनेक शेतकरी भूमिहीन तसेच अल्पभूधारक होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले. त्यांनी उपोषणाचे अस्त्र उगारले आहे. विरोध दर्शविण्यासाठी येथील शेतकरी व आराखडाबाधित नागरिकांतर्फे उद्या (ता. २२) सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत नगर परिषदेसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येईल.
आरक्षित जमिनीवर वैद्यकीय अथवा आर्थिक विवंचनेतून कर्ज घेण्याचे झाल्यास कोणतीही बँक, पतपेढी कर्जपुरवठा करणार नाही. शेतकऱ्यास ही जमीन विकावयाची झाल्यास ती विकता येणार नाही. ग्राहक मिळाल्यास ती कवडीमोलाने विकावी लागेल. अनेक शेतकरी यापूर्वी दूधगंगा प्रकल्प, कालवा, आरटीओ, पाणीपुरवठा योजना, महामार्ग आदी प्रकल्पांसाठी जमीन गमावून अल्पभूधारक झाले आहेत. प्रस्तावित आराखड्यात २४, १८, १२, ९ मीटरचे रस्ते प्रस्तावित केले आहेत. यात अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. प्रस्तावित रस्ते, विहीर, कूपनलिका या जलस्रोतातून जातात. यामुळे शेतकऱ्यांना पाण्याच्या प्रश्नास सामोरे जावे लागेल. आरक्षित केलेल्या जमिनी या पूर्णतः बारमाही पिकाऊ आहेत. या विकास आराखड्यामुळे कागलमधील शेती क्षेत्र कमी होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यापूर्वीच्या विकास आराखड्यातील ४७ पैकी २२ आरक्षणे ३७ वर्षांत अविकसित राहिली आहेत. असे असताना पुन्हा नव्याने आरक्षण कशसाठी? असा सवाल उपस्थित केला जात आहे.