
उसाचा ४०० रुपये दुसरा हप्ता मिळावा
उसाचा ४०० रुपये दुसरा हप्ता मिळावा
स्वाभिनानी शेतकरी संघटनेतर्फे शरद कारखान्यास निवेदन
सकाळ वृत्तसेवा
खोची, ता. १ ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे गत हंगामातील उसाचा दुसरा हप्ता ४०० रुपये मिळावा. याबाबत शरद सहकारी साखर कारखाना प्रशासनास निवेदन दिले. निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वीकारून याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.
निवेदनामध्ये, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये झालेल्या ऊस परिषदेमध्ये साखर कारखान्यांनी एक रकमी एफआरपी द्यावी, गळीत हंगाम संपल्यानंतर कारखान्यांनी हिशेब करून उर्वरित दुसरा हप्ता द्यावा, अशी भूमिका घेतली होती, पण गळीत हंगाम संपून एकाही साखर कारखान्याने हिशेब पूर्ण केलेला नाही. त्यामुळे कारखान्यांनी शेतकऱ्यांना दुसरा हप्ता ४०० रुपये द्यावा. २०२२-२३ मध्ये साखर कारखान्याकडील साखरेला चांगला दर मिळाला आहे. इतर उपपदार्थांनाही चांगला दर मिळत आहे. दुसऱ्या बाजूला रासायनिक खतांचे वाढलेले दर, फवारणीच्या औषधाचे दर, डिझेल दरवाढीमुळे मशागतीचे वाढलेले दर यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक गणित कोलमडले आहे. याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास २ ऑक्टोबरपासून कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे.
स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, जिल्हा सरचिटणीस शिवाजी पाटील, उपाध्यक्ष धनाजी पाटील, आप्पासाहेब एडके, राजू मालगावे, सुधीर मगदूम, एकनाथ खाडे, पंकज पाटील, विनोद कागवाडे, दीपक मगदूम आदी उपस्थित होते.