
बसुदेव धनगरवाड्यास पाणी पाणी म्हणण्याची वेळ : शासकीय योजना कुचकामी.
04433
बसुदेव धनगरवाडा ः येथील धनगर बांधवांना व मुलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. (अरविंद सुतार, सकाळ छायाचित्रसेवा)
...
बसुदेव धनगरवाडा पाण्याविना तहानला
शासकीय योजना कुचकामीः ओढ्यातील पाण्यावर भागवावी लागते तहान
सकाळ वृत्तसेवा
कोनवडे, ता. ८ : नैसर्गिक स्रोत आटत चालल्याने व शासकीय योजना कुचकामी ठरल्याने भुदरगड तालुक्यातील मिणचे बुद्रुक पैकी बसुदेव धनगरवाडा पाण्याविना तहानला आहे. पाणी टंचाईमुळे धनगर बांधवाना पाणी पाणी म्हणण्याची वेळ आली आहे. जंगलातून जीव धोक्यात घालून ओढ्यातील पाण्यावर त्यांना तहान भागवावी लागत आहे.येथील धनगरवाड्यावर पाणी पुरवठा करणाऱ्या शासकीय व जलजीवन योजना कुचकामी ठरत आहेत. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन न झाल्याने यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
बसुदेव धनगरवाड्यावर सायफन पद्धतीने जंगलातून येणाऱ्या पाण्यावर पाणी पुरवठा होतो. पण जलस्रोत आटत चालल्याने पाण्यासाठी त्यांची भटकंती सुरू आहे. दोनशे वस्तीचा हा धनगरवाडा दुर्गम ठिकाणी आहे. पाण्याचे कोणतेही साधन येथे उपलब्ध नाही. येथे कुपनलिकाही नसल्याने लहान मुले, महिला, अबालवृद्ध यांना घागरभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालून वन्य प्राण्यांचा सामना करत जंगलातून भटकावे लागत आहे. येथील सुनीता ठकू हुंबे या तरुणीवर रविवारी (ता. ७) गव्याने हल्ला केला होता, यात ती गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशा अनंत अडचणींचा सामना करत धनगर बांधव जगत आहेत.
माणसांना पुरेसे पाणी नाही मग जनावरांना कुठून मिळणार त्यामुळे जनावरेही अगतिक झाली आहेत. ओढ्यातील पाण्यावर हे बांधव तहान भागवत आहेत. दिवसेंदिवस येथील पाणीप्रश्न गंभीर बनत आहे.
...
‘अनेक अडचणींचा सामना करत लहान मुलांसह धनगर बांधवाना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शासनाने आमची पाण्याची व्यवस्था करावी.
मनू हुंबे, बसुदेव धनगरवाडा