
माझी वसुंधरा अभियान
माझी वसुंधरा अभियान
प्रभावीपणे राबवा ः राव
कोल्हापूर, ता. १ : माझी वसुंधरा अभियान ३.० ची अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुरू झाली आहे. या अभियानाचे टूलकिट सर्व यंत्रणेला पाठविले. हे अभियान गावागावांत प्रभावीपणे राबवून गेल्या वर्षीपेक्षा चांगली कामगिरी करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या. जवळपास अडीच तास चाललेल्या ऑनलाईन बैठकीत अभियानाच्या अनुषंगाने विविध बाबींवर चर्चा झाली. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव उपस्थित होते.
पर्यावरणाचे जतन आणि संवर्धनासाठी अभियान राबविले जात आहे. भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्पर्धा सुरू आहे. यात पंचतत्त्वांशी संबंधित विविध उपक्रम राबविले जात आहेत. जैवविविधतेचे अस्तित्व टिकविणे, शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धत अवलंबण्यासाठी हे अभियान महत्त्वाचे आहे. अभियान यशस्वी करण्यासाठी काय उपक्रम राबविले, त्याचे गुणांकन होणार आहे. यात पृथ्वी, वायू, जल, अग्नी तसेच आकाश तत्त्वांच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबविण्यासाठी १५०० गुण दिले आहेत. यात जास्तीत जास्त गुणांकन घेणाऱ्या संस्थांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. या स्पर्धेत जिल्ह्याने चमकदार कामगिरी करावी, अशी सूचना राव यांनी केली.