
इचल : गायरान सर्वोच्च न्यायालय आदेश
गायरान अतिक्रमणप्रश्नी
उच्च न्यायालयातच दाद मागा
सर्वोच्च न्यायालयाचे आदेश : आमदार आवाडे यांची माहिती
इचलकरंजी, ता. २ : गायरानातील अतिक्रमणे निष्कासित करण्याच्या आदेशाला स्थगिती मिळावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. त्यामध्ये युक्तिवाद ऐकून घेऊन न्या. सी. के. कौल व न्या. अभय ओक यांच्या खंडपीठाने या संदर्भात उच्च न्यायालयामध्येच दाद मागावी, असे आदेश दिले आहेत, अशी माहिती याचिकाकर्ते तथा आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली.
उच्च न्यायालयाने गायरानातील अतिक्रमणे निष्कासित करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार प्रशासनाकडून प्रक्रिया सुरू झाली असून महसूल विभागाकडून अतिक्रमण हटवण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. या आदेशामुळे हजारो कुटुंबे उघड्यावर पडणार असल्याने अतिक्रमण काढण्यास विरोध होत आहे. त्याच अनुषंगाने अतिक्रमणधारकांची बाजू घेत सर्वोच्च न्यायालयात आमदार आवाडे यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
न्या. कौल व न्या. ओक यांच्या खंडपीठासमोर आमदार आवाडे यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील आर. वसंत यांनी युक्तिवाद केला. त्यांना ॲड. प्रवीण सटाले यांनी सहाय्य केले. भूमिहीन लोकांनी अतिक्रमण केलेल्यांना यापूर्वी शासनामार्फत प्लॉट अलॉटमेंट दिले आहे. रितसर सनद देण्यात आली आहे. तरीही त्यांना अतिक्रमण निष्कासित करण्याच्या नोटिसा लागू केल्या आहेत. ही अतिक्रमणे अनेक वर्षांपासून असून नागरिक तेथे वर्षानुवर्षे राहत आहेत. हे अतिक्रमण काढल्यास अनेक कुटुंबाना बेघर होऊन रस्त्यावर यावे लागणार आहे. त्यांचे संसार उघड्यावर पडणार आहेत यांसह त्यांच्या व्यथा न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. युक्तिवाद ऐकून घेऊन याबाबत उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याविषयीचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
------
कोट
‘गायरान अतिक्रमणप्रश्नी सर्वोच्च न्यायाल्याच्या आदेशानुसार आम्ही उच्च न्यायालय येथे दाद मागणार आहोत.
आमदार प्रकाश आवाडे, याचिकाकर्ते