
सत्यशोधक कृष्णाजी पाटील यांच्यावरील व्याख्यान
66248
....
महर्षी शिंदेंचे विचार कृतीतून
अंमलात आणण्याची गरज
डॉ. सुनीलकुमार लवटेः
कोल्हापूर, ता. ३ : ‘समकालीन प्रश्न सोडविण्यासाठी महर्षी वि. रा. शिंदे यांचे विचार कृतीतून अंमलात आणण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले.
शिवाजी विद्यापीठ, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचा इतिहास विभाग आणि कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे संशोधनतर्फे आयोजित सत्यशोधक कृष्णाजी रामजी पाटील व्याख्यान पुष्पामध्ये ‘महर्षी वि. रा. शिंदे यांच्या विचारांची प्रस्तुतता’ यावर ते बोलत होते. प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
डॉ. लवटे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांचे, वंचितांचे, महिलांचे प्रश्न आजही गंभीर स्वरूप धारण करून आहेत. महर्षी शिंदे यांनी १९ व्या शतकाच्या उत्तरार्धातील या आणि इतर समस्यांसाठी कृतीयुक्त लढा दिला. धर्म, जात, पंथ, वंशाच्या पलीकडे जाऊन समाजातील शेवटच्या शोषित-वंचित घटकांपर्यंत जाऊन त्यांनी अखंडपणे त्यांच्या न्यायहक्कासाठी लढा दिला. त्यांनी समाजासमोर जी तत्त्वे मांडली, त्याप्रमाणे ते अखंडपणे वागले. अमेरिकेत जाऊन त्यांनी सर्व धर्मांचा चिकित्सक अभ्यास केला. सर्व धर्मांनी चांगलीच तत्त्वे सांगितली आहेत, त्याचे आचरण करून मानवकल्याण साधले पाहिजे; परंतु धर्ममार्तंड आपल्या स्वार्थासाठी समाजाला अंधश्रद्धाळू बनवून शोषण करतात. आजच्या युगात धर्माच्या जोखडात गुंतून न पडता सर्वसमावेशक जीवन जगले पाहिजे. समाजातील सर्व घटकांची सर्वांगीण प्रगती होईल, यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.’’
प्राचार्य डॉ. शानेदिवाण यांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे संशोधन केंद्रातील उपक्रमांची माहिती दिली. समन्वयक डॉ. एस. व्ही. शिखरे यांनी स्वागत केले. प्रा. डॉ. एस. एस. पाटील यांनी परिचय करून दिला. प्रा. पी. के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एस. डी. अपराध यांनी आभार मानले. संयोजन डॉ. एस. डी. जाधव यांनी केले.
या वेळी सत्यशोधक कृष्णाजी रामजी पाटील यांचे नातू हंबीरराव पाटील, सुनील नागावकर, प्रकाश आमटे, प्रबंधक रवींद्र भोसले, ग्रंथपाल डॉ. पांडुरंग पाटील, डॉ. एन. एस. जाधव, डॉ. आर. डी. मांडणीकर, सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.