
अवर्षण, हवामानातील बदलामुळे ऊस पिकांत हुमनीचा प्रादुर्भाव डॉ. अभयकुमार पिसाळ
71639
कोवाड : येथील शेतकरी मेळाव्यात उपस्थित असलेले शेतकरी.
अवर्षण, हवामानातील बदलामुळे
ऊस पिकांत हुमणीचा प्रादुर्भाव
डॉ. अभयकुमार पिसाळ; कोवाडला शेतकरी मेळावा
सकाळ वृत्तसेवा
कोवाड, ता. २८ : अवर्षण स्थिती, पाण्याचा ताण आणि हवामानातील बदल या प्रमुख कारणांमुळे ऊस पिकांत हुमणीचा प्रादुर्भाव वाढत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक उपाययोजनांची गरज आहे. शेतकऱ्यांनी हुमणीपासून उसाला सुरक्षित ठेवण्यासाठी शास्त्रोक्त उपाय करावेत, असे मत कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अभयकुमार पिसाळ यांनी व्यक्त केले.
येथील साई शेती सेवा केंद्र व अदामा कंपनीतर्फे आयोजित शेतकरी मेळाव्यात ऊस पिकाचे संरक्षण या विषयावर प्रा. पिसाळ बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य कल्लापा भोगण होते. दीपक भालेराव, आप्पा कुलकर्णी, सागर गार्डे, गणेश काटकर उपस्थित होते.
डॉ. पिसाळ म्हणाले, ‘‘हुमणीचा बहुतांशी जीवनकाळ हा मातीत जात असल्याने प्रादुर्भाव लक्षात येत नाही. त्यामुळे वेळीच नियंत्रण करणे अडचणीचे ठरते. मोसमी पावसाला सुरुवात होत असताना या काळात लिंब, बाभूळ आणि बोर या झाडांवर मिलनासाठी प्रौढ भुंगेरे एकत्र येतात. त्यावेळी ते एकत्र करून नष्ट करणे हा सोपा उपाय आहे. हुमणी ही अतिशय हानिकारक व सर्वत्र पसरलेली कीड आहे. ही आळी ऊस पिकाचे मोठे नुकसान करते. उसाची मुळे कुरतडत असल्याने उसाची बेटे वाळून जमिनीवर पडतात. हुमणीची जमिनीत गुंतागुंतीची जीवनसाखळी असल्याने किडीचे नियंत्रण करणे अवघड जाते. त्यासाठी कोणत्याही एका पद्धतीवर अवलंबून राहण्यापेक्षा एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्राचा वापर करून हुमणी नियंत्रणात आणावी.’’
कल्लापा भोगण यांनी किटकनाशकांच्या फवारणीबाबत शेतकरी हालगर्जी राहत असल्याचे सांगून त्याबाबत शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी, असा सल्ला दिला.
सचिन पाटील यांनी स्वागत केले. दीपक भालेराव यांनी प्रास्ताविक केले. या वेळी विरुपाक्ष किणीकर, जनार्दन देसाई, नरसिंग बाचूळकर, एम. एन. पाटील, एस. एस. पाटील, संतराम पाटील, मारुती पट्टेकर, संजय कुट्रे, नागोजी पाटील, भागोजी लांडे, शिवाजी पाटील आदी शेतकऱ्यांनी चर्चेत भाग घेतला. पांडुरंग जाधव यांनी सूत्रसंचालन केले. सचिन पाटील यांनी आभार मानले.