
आजऱ्यात ३ गावे ७ वाड्यांना टंचाईच्या झळा
आजऱ्यात तीन गावे,
सात वाड्यांवर टंचाई
पाण्यासाठी ग्रामस्थांची धडपड; नवीन विंधन विहिरीचा प्रस्ताव
रणजित कालेकर ः सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २८ ः तालुक्यात ऐन एप्रिल महिन्यात उन्हाळा तीव्र झाला आहे. उन्हाच्या झळा जितक्या तीव्र होत आहेत, त्याप्रमाणे पाणीटंचाईच्या झळाही जाणवू लागल्या आहेत. तालुक्यात एप्रिलपासून तीन गावे व सात वाड्यांना पाणीटंचाई भासू लागली आहे. या गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी धडपड करावी लागत आहे. पंचायत समितीने या गावांचा प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे. ही गावे व वाड्यांना नवीन विंधन विहीर घेण्याचे प्रस्तावात सुचविले आहे.
आजरा तालुका पावसाचे माहेर घर मानला जातो. दरवर्षी सुमारे अडीच ते तीन हजार मिमी. पाऊस पडतो. या पाच-सहा वर्षांत यामध्ये वाढ झाली आहे. पावसाचे प्रमाण जरी वाढले तरी पावसाळ्यात चार महिने सतत पाऊस पडत नाही. अतिवृष्टी, ढगफुटीचे संकट तयार झाले आहे. मार्च, एप्रिल महिन्यात वळवाचा पाऊस, तर नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये अवकाळी पाऊस पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे पाणी वाहून जाण्याचे प्रमाण मोठे आहे. पाणी जमिनीत मुरुन भूजल पातळी वाढत नसल्याचे जलतज्ज्ञ सांगतात. त्यामुळे तालुक्यात पावसाचे प्रमाण मोठे असले तरी पाणीटंचाईच्या झळा दरवर्षी जाणवतात. नुकताच एप्रिल ते जून या तीन महिन्यांचा पाणीटंचाईचा आराखडा पंचायत समितीने पाठवला आहे. यामध्ये बहिरेवाडी, मलिग्रे व सोहाळे या तीन गावांत पाणीटंचाई भासू लागली आहे, तर पारपोलीपैकी गावठाण, सुळेरानपैकी माऊली हायस्कूल वस्ती, वाटंगीपैकी शाहू वसाहत, खानापूरपैकी रायवाडा, उचंगीपैकी हुडे, गवसेपैकी वास्करवाडी, चाफवडेपैकी आदर्श वसाहत या वाड्यावर पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. तीन गावे व सात वसाहतींना नवीन विंधन विहीर घेण्याबाबत प्रस्तावात सुचविले आहे. यासाठी सुमारे पाच लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. संबंधित ग्रामपंचायतींना टंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी सूचना दिल्याचे गटविकास अधिकारी बी. डी. वाघ यांनी सांगितले.
-------------------
चौकट
जलजीवन मिशनमधून शंभर कोटींची कामे
तालुक्यात जलजीवन मिशनमधून विविध गावांत शंभर कोटी रुपये पाणी योजनेसाठी खर्च होणार आहेत. नदी, ओढे किंवा पाण्याचे उपलब्ध स्त्रोत यातून योजना राबविली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात तालुक्यात पाणीटंचाईवर मात करता येईल, असे वाघ यांनी सांगितले.
-------------------
सोहाळेतील टंचाईवर मात करण्यात यश
दरवर्षी सोहाळे व सोहाळेपैकी बाची या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. सोहाळे बंधारा नादुरुस्त असल्याने या बंधाऱ्यात पाणी गळती राहिल्याने या गावांवर पाणीटंचाईचे संकट मोठे होते. यंदा या बंधाऱ्याची दुरुस्ती केल्याने पाणीसाठा टिकून राहिला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y53294 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..