
बाळासाहेब थोरात
आगामी निवडणुका एकत्रच लढणार
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात; बंडखोरीच्या ठिकाणी चर्चेने निर्णय घेऊ
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ ः भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यातील आगामी निवडणुकांमध्ये तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढणार असल्याचे काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. मंत्री थोरात आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त आयोजित समारंभात ते उद्या (ता.६) सहभागी होणार आहेत.
पंधरा दिवसांत राज्यातील निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्याचा निकाल काल सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मंत्री थोरात यांना विचारले असता राज्यातील सर्व निवडणुका एकत्रित महाविकास आघाडी म्हणून लढविणार असल्याचे सांगितले. भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्रित लढतील. ज्या ठिकाणी बंडखोरी होण्याची शक्यता आहे, तेथे तिन्ही पक्षांचे नेते एकत्रित चर्चा करून निर्णय घेतील, असेही स्पष्ट केले. महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे, मात्र मी तिथं नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
निवडणुका केव्हा घ्यायच्या याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने पुढील निर्णय घ्यायचा असल्याचेही मंत्री थोरात यांनी सांगितले. पावसाळ्यात निवडणुका घेणे शक्य आहे काय, यावर मंत्री थोरात म्हणाले, की शेतीची कामेही सुरू होतात. त्यामुळे काय करायचे याबाबतचा निर्णय राज्य निवडणूक आयोग घेईल. याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालय आणि राज्य निवडणूक आयोग ठरवेल. संभाजीराजे छत्रपती यांची खासदारकीची मुदत संपली आहे. त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होईल का, यावर कोणतीही प्रतिक्रिया थोरात यांनी दिली नाही. भोंग्याच्या प्रश्नासह इतर प्रश्नांवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हा विषय सामाजिक म्हणत असतील, पण ते राजकारण करत आहेत असेही त्यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्रातील जनता समजदार आहे. सामाजिक सलोखा जपण्याचे काम जनतेने केल्याचेही त्यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55451 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..