
मोठ्या अपेक्षांचे ओझे घेवून वाटचाल
लोगो ः इचलकरंजी महापालिका होताना -५
मोठ्या अपेक्षांचे ओझे घेऊन वाटचाल
संबंधित यंत्रणांची जबाबदारी वाढणार ः राजकीय एकजुटीमुळे मार्ग सुलभ
पंडित कोंडेकर ः सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १० ः कोणताही उघड राजकीय विरोध न होता एकमुखी निर्णयातून इचलकरंजी महापालिकेचे स्वप्न साकारत आहे. अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर मतभेद असतानाही या विषयावर मात्र राजकीय एकजूट पाहावयास मिळाली. सक्षम राजकीय पाठपुराव्यामुळे अशक्य अशी वाटणारी गोष्ट अल्पावधीत शक्य झाली आहे, तर यापूर्वी नगरपालिकेच्या कारभाराचा अनुभव नागरिकांना घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका झाल्यानंतर नागरिकांच्याही मोठ्या अपेक्षा असणार आहेत. त्या पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित सर्व यंत्रणांवर असणार आहे.
महापालिका होताना आजही काही प्रश्न निर्माण होत आहेत. काही तांत्रिक अडचणी आहेत. त्यावर पुढील काळात मार्ग काढला जाईल. मुळात महापालिका करण्याचा विषय समोर आल्यानंतर राजकीय विरोध झाला नाही. त्यामुळे महापालिका करण्याच्या कामाला गती आली. अधिसूचना निघेपर्यंत महापालिका सद्यस्थितीला होणे अशक्य असल्याचे मत व्यक्त करण्यात येत होते, मात्र खासदार धैर्यशील माने यांच्या राज्य पातळीवरील सक्षम पाठपुराव्यामुळे इचलकरंजी महापालिका करण्याची संधी लवकर मिळाली. फारसा संघर्ष न करता किमान पाच वर्षे अगोदर महापालिका होत आहे. शहराच्या दृष्टीने ही एक फार मोठी सकारात्मक बाब आहे.
पूर्वानुभव पाहता राजकीय श्रेयवादामुळे शहराचे मोठे नुकसान झाले आहे. नळपाणी योजना, आयजीएम हस्तांतर, प्रादेशिक परिवहन विभाग अशा अनेक प्रश्नांवर मतभेद पाहावयास मिळाले आहेत. त्याचा नकळत फटका अनेक घटकांना बसला आहे, पण महापालिकेच्या बाबतीत मात्र वेगळे चित्र पाहावसाय मिळाले. नजीकच्या काळात महापालिका पूर्णत्वास येईल. त्यानंतर इचलकरंजी शहराची वस्त्रोद्योगाशिवाय महापालिका असलेले शहर म्हणून नवी ओळख मिळेल.
मुळात महापालिका झाल्याचा कोणताही आर्थिक बोजा नागरिकांवर न पडता शहराच्या नव्या विकासपर्वाला सुरुवात झाल्याचे सकारात्मक चित्र दिसण्याची गरज आहे. त्यामुळे महापालिकेचे स्वप्न साकारले असले तरी वास्तवाचे भानही राखण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांवर असणार आहे. त्यादृष्टीने आतापासूनच नियोजनाला सुरुवात करण्याची गरज आहे. किंबहुना महापालिका झाल्याचे समाधान सर्वच घटकांना वाटले पाहिजे, अशा रास्त अपेक्षा आहेत.
(समाप्त)
------------
प्रस्तावित पाणीपुरवठा योजना
शहरासाठी सध्या कृष्णा आणि पंचगंगा योजना कार्यान्वित आहेत. तथापि, दोन्ही योजना कालबाह्य झाल्या आहेत. त्यांचे तूर्तास सक्षमीकरण करण्यात येत आहे. चार लाख लोकसंख्या लक्षात घेता दूधगंगा योजना प्रस्तावित केली आहे. २१.५० किमीची ही योजना आहे. महापालिकेनंतर या योजनेत गती मिळण्यास मदत होईल.
-------------
सध्याची आरोग्य व्यवस्था
सार्वजनिक शौचालय संख्या - ४८
पुरुष सीट - ४९०
महिला सीट - ५१०
पे अॅन्ड शौचालय सुविधा - ३४
कचरा डेपो क्षेत्रफळ (एकर) - १६
नागरी आरोग्य केंद्र - ६
बाह्यरुग्ण विभाग - १
खासगी रुग्णालय - ११०
-----------
शहराच भौगोलिक स्थान
शहराची समुद्र सपाटीपासूनची उंची ५३९ मीटर (१७६८ फूट) इतकी आहे. शहराची आतापर्यंत दोन वेळा हद्दवाढ झाली आहे. त्यानुसार सध्याचे नगरपालिकेचे कार्यक्षेत्र २७.७० चौरस किलोमीटर इतके आहे, तर मूळ कार्यक्षेत्र २०.३८ चौरस किलोमीटर इतके होते.
------------
शहरातील रस्ते दृष्टिक्षेप (किलोमीटर)
सिमेंट काँक्रिट रस्ते - ४४.७६
डांबरी रस्ते - ३५०.२९
खडीचे रस्ते - ४६.०४
इतर रस्ते - ११.२५
एकूण - ४५२.३४
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56818 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..