
समझोता एक्सप्रेस गतीमान होणार?, चंदगडला बेरजेच्या राजकारणाचे संकेत समझोता एक्सप्रेस गतीमान होणार?
21311
मजरे कारवे : दुचाकीवरून एकत्रित प्रवास करताना आमदार राजेश पाटील व भरमूअण्णा पाटील.
समझोता एक्स्प्रेस गतिमान होणार?
चंदगडला बेरजेच्या राजकारणाचे संकेत; जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीची तयारी
सुनील कोंडुसकर : सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १२ : वर्षभरापूर्वी एका दुचाकी शोरूमच्या उद्घाटनप्रसंगी आमदार राजेश नरसिंगराव पाटील व माजी राज्यमंत्री भरमूअण्णा सुबराव पाटील यांनी दुचाकीवरून फेरफटका मारला होता. त्यावेळी त्यांचा राजकीय प्रवाससुद्धा एकत्रित होणार का? अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या होत्या. गेल्या सहा महिन्यांत तालुक्यातील विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने या दोन नेत्यांचा व्यासपीठावरील वावर आणि एकमेकांच्या उपस्थितीबाबत संयोजकांकडे आग्रह पाहता त्यांची ही ‘आरएन-बीएस’ समझोता एक्स्प्रेस राजकीय महामार्गावर गतिमान होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीपासून त्याची प्रत्यक्ष सुरुवात होण्याची शक्यता आहे.
आमदार पाटील यांचे वडील कै. नरसिंग गुरुनाथ पाटील व भरमूअण्णा पाटील गटाने सुमारे चाळीस वर्षांहून अधिक काळ राजकीय दुष्मनी निभावली. विधानसभा निवडणुकीत हे दोन गट नेहमी एकमेकांच्या समोर ठाकले. दौलत साखर कारखाना, चंदगड तालुका संघ, नवमहाराष्ट्र शिक्षण मंडळ, जिल्हा मध्यवर्ती बॅंक यासारख्या महत्त्वाच्या संस्थांवर वर्चस्व असल्याने १९९५ च्या निवडणुकीचा अपवाद वगळता नरसिंग गुरुनाथ पाटील गट नेहमीच वरचढ राहिला. सन २००० पर्यंत या दोन गटांचे राजकारण संघर्षमय राहिले. त्यानंतर दौलत कारखान्याच्या सत्तेवरून नरसिंगराव पाटील यांचे मेहुणे गोपाळराव पाटील यांनी वेगळी चूल मांडली. या गटात उभी फूट पडली. त्यानंतर मात्र तालुक्याच्या राजकारणात समझोता एक्स्प्रेस धावू लागली. विविध संस्थांच्या निवडणुकीत सोयीस्कर युती केली जाऊ लागली. त्यामुळे कट्टर विरोधकाचे नाते मित्रत्वामध्ये बदलले. राजकीय अपरिहार्यता म्हणून अनेकदा ते पुन्हा एकमेकांच्या विरोधात उभे राहिले परंतु, राजकारणात नेहमीच कोणी शत्रू किंवा मित्र नसतो याची समज प्रत्येकाला आली.
काळाने राजकारणावरही आपला प्रभाव दाखवला आहे. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील विविध पक्षांच्या बदलत्या भूमिका, जुन्या नेतृत्वाचा मावळता काळ आणि नवीन नेतृत्वाचा उदय यामुळे प्रत्येकजण सोयीची भूमिका घेताना दिसून येतो. चंदगड विधानसभा मतदारसंघात आमदार राजेश पाटील यांनी विकासकामांच्या माध्यमातून जोरदार मुसंडी मारली आहे. शांत, संयमी स्वभावाचा त्यांना लाभ होतच आहे, शिवाय विधानसभेसह तालुका पातळीवरील महत्त्वाच्या संस्था ताब्यात असल्याने गावागावांत कार्यकर्त्यांचे जाळे आहे. त्यांची राजकीय प्रगल्भता आता जाणवू लागली आहे. बेरजेच्या राजकारणाला महत्त्व देऊन त्यांची वाटचाल सुरू आहे. भरमूअण्णा पाटील गटाशी युती झाल्यास तालुक्यातील राजकारण सोपे होणार आहे. मात्र, त्यासाठी राजकीय समझोता महत्त्वपूर्ण मानला जातो. कोणत्या संस्थेवर कोणाचा प्रतिनिधी घ्यायचा याची निश्चिती करून तो आकार घेऊ शकतो. सध्या नेत्यांचा एकत्रित वावर आणि गाव पातळीवर कार्यकर्त्यांचा समेट पाहता तो पूर्णत्व धारण करण्याची शक्यता अधिक आहे.
-------------
चौकट
मामा काय करणार?
आमदार पाटील यांनी मामा गोपाळराव पाटील यांचे बोट धरून आपण राजकारणात आल्याचे एका कार्यक्रमात सांगितले. दोघांतील ऋणानुबंध दृढ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गेल्या दोन दशकांतील त्यांच्यातील संघर्ष पाहता भाच्याच्या भावनिक आवाहनाला मामा गोपाळराव पाटील प्रतिसाद देणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57504 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..