
पूरक आहाराचा निधी दीड वर्षे थकीत
पूरक आहाराचा निधी दीड वर्षे थकीत
क्षयरोग निर्मूलन मोहिमेलाच खीळ बसण्याची शक्यता; इचलकरंजीत २०० रुग्ण
संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २५ : देशामधून २०२५ पर्यंत क्षयरोग निर्मूलन करण्याची मोहीम पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. त्या अनुषंगाने जिल्हा, तालुक्यासह ग्रामीण भागामधील प्राथमिक आरोग्य केंद्रावर प्रबोधन करण्यात येत आहे, मात्र एकीकडे निर्मूलनासाठी प्रयत्न होत असताना शासनाकडून देण्यात येणारा पूरक आहाराचा निधी जिल्ह्याचा जानेवारी २०२१ पासून थकीत आहे. इचलकरंजी शहरातील २०० रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे सरकारच्या क्षयरोग निर्मूलन मोहिमेलाच खीळ बसणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण विभागामध्ये सुमारे २ हजार ६५ क्षयरोग सक्रिय रुग्ण संख्या आहे. इचलकरंजी शहर व परिसरातील सुमारे १७ गावांमध्ये २३५ रुग्ण क्षयरोगावर उपचार घेत आहेत. यामधील ७० टक्के रुग्ण हे केवळ इचलकरंजी शहरातील आहेत. आधुनिक उपचार पद्धतीमुळे रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. शासन संक्रमित रुग्णांना पूरक आहार घेण्यासाठी महिन्यास ५०० रुपये निधी देते. हा निधी उपचार सुरू असेपर्यंत म्हणजेच सहा महिने रुग्णाच्या खात्यावर जमा करण्यात येतो, मात्र दीड वर्षापासून रुग्णांना निधी मिळालेला नाही.
१९८५ पूर्वी क्षयरोग म्हणजे मृत्यू असे समजले जात होते. सध्याही या रोगाबाबत नागरिकांमध्ये माहितीचा अभाव दिसून येतो. शरीरातील नख व केसाव्यतरिक्त सर्व अवयवांना क्षयरोग होऊ शकतो, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते, मात्र बहुतांश नागरिकांना केवळ फुफ्फुसाच्या क्षयरोगाबाबतच माहिती आहे. परिणामी अन्य अवयवांच्या क्षयरोगावरील निदान व उपचारास वेळ होताना दिसतो. क्षयरोग निदान उपचारासाठी महिन्यातून दोन शिबिर आयोजित करण्यात येतात. तसेच खासगी डॉक्टरांनी निदान करून केंद्रास माहिती दिल्यास प्रत्येक रुग्णामागे ५०० रुपये देण्यात येत आहे. जेणेकरून देशातून क्षयरोगाचे पूर्ण उच्चाटन व्हावे, हा उद्देश आहे, मात्र पूरक आहाराचा निधी थकल्याने शासनाकडून मोहिमेचे गांभीर्य कमी झाले आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे.
----------
जिल्ह्याला सिल्व्हर मेडल
कोल्हापूर जिल्ह्यास या मोहिमेमध्ये उत्तम कामगिरी केल्याने सिल्व्हर मेडलने सन्मानित केले आहे. तसेच शहरातील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील अत्याधुनिक सीबीएएटी या मशिनद्वारे केवळ दोन तासांत अहवाल प्राप्त होतो. तोही अचूक त्यामुळे प्रारंभीच उपचार होत असल्याने रुग्णांची प्रकृती गंभीर होण्यापासून बचाव होत आहे. आयजीममध्ये दररोज १० ते १२ तपासण्या करण्यात येत आहेत.
--------
तांत्रिक दोषाने निधी थकीत
क्षयरोग संक्रमित रुग्णांना रोगामधून बाहेर पाडण्यासाठी आहार महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे शासनपूरक आहारासाठी निधी देते. सुरुवातीस जिल्ह्यामधून तालुक्यास निधी पाठवण्यात येत होते. सध्या केंद्राकडून थेट रुग्णाच्या खात्यावर जमा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये तांत्रिक दोषामुळे हा निधी थकल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
---------
दृष्टिक्षेप : (ग्राफ करणे)
वर्ष *खासगी रुग्णालय *सरकारी रुग्णालय
२०१८ *२०५ * २६७
२०१९ *१९६ *२७८
२०२० *१११ *२३०
२०२१ * १२७ *२३५
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61397 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..