
लोकप्रतिनिधी, नागरिकांनी फिरवली पाठ
लोगो- जिल्हा परिषद
प्रशासकीय कामकाज गतिमान होणार का?
जिल्हा परिषद, पंचायत समितीत शुकशुकाट; प्रलंबित कामांची यादी चालली वाढत
सदानंद पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : सदस्यांची मुदत संपल्याने २० मार्चला जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर प्रशासकांची नेमणूक झाली. त्यामुळे सर्व कारभार अधिकाऱ्यांच्या हातात एकवटला. पदाधिकारी कार्यरत असताना अनेक चांगल्या योजना, उपक्रम राबताना, प्रशासकीय निर्णय घेताना राजकीय अडचणी येत होत्या. पदाधिकाऱ्यांत एकमत होत नसल्यानचा फटका योजनांवर, प्रशासकीय कामकाजावर होत होता. प्रशासक आल्यानंतर प्रलंबित कामे, योजना, चौकशी, नावीण्यपूर्ण प्रकल्प, बदल्या, स्थानांतरण आदी बाबी ठिकठाक होणे अपेक्षित आहे. राजकीय उदासीनतेमुळे न होणारी कामे आता पूर्ण करणे अपेक्षित आहे. मात्र, अपवाद वगळता यामध्ये प्रगती झालेली नाही. अधिकारी सातत्याने बैठका आणि दौऱ्यात असल्याने दाद कुठे मागायची, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
प्रशासकांची नेमणूक होऊन तीन महिने पूर्ण होतील. या काळात एकही अधिकारी बदललेला नाही. त्यामुळे कोणत्या विभागात कोणती कामे प्रलंबित आहेत, कोणत्या ठिकाणी धोरणात्मक निर्णय घेणे अपेक्षित आहे, प्रलंबित चौकशी पूर्ण करून दोषींवर कारवाई करण्यासाठी व जिल्हा परिषदेपासून ते ग्रामपंचायतीपर्यंत ढिसाळ झालेल्या प्रशासकीय कामकाजास गतिमान करण्याची ही मोठी संधी आहे. मात्र आत्तापर्यंत तरी ते पहायला मिळालेले नाही. मागील पाच वर्षांत सातत्याने उत्पन्न वाढीची घोषणा झाली. यासाठी आर्थिक तरतूदही केली. मात्र, हा खर्च वळवण्यात आला. आता याबाबत काही तरतूद करून थेट त्याच कामावर खर्च करण्याचे नियोजन करणे आवश्यक होते. मात्र, तसे झालेले नाही.
जिल्हा परिषद मुख्यालय व पंचायत समित्यातही अनेक कर्मचारी ठाण मांडून आहेत. प्रतिनियुक्ती रद्द करण्याबाबत सातत्याने सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. आजही चंदगड भवनच्या वापरावर बांधकाम विभागाचे नियंत्रण नाही. त्याची आचारसंहिता तयार केलेली नाही. कुस्ती मॅट घोटाळा प्रकरण जवळपास दडपले आहे. कबड्डी मॅट घोटाळ्याची समिती नेमली. मात्र, आजतागायत एकही बैठक झालेली नाही. डीआरडीए घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी गट विकास अधिकाऱ्यांना पत्र दिले. मात्र, त्याचा पाठपुरावा झालेला नाही. अनेक शाळा खोल्या, अंगणवाड्या, ऑपरेशन थिएटरची दुरवस्था झाली आहे. पावसाळा सुरुरू झाला आहे. अशा काळात दुरुस्तीच्या कामांसाठी पाठपुरावा करणे आवश्यक होते. मात्र, या पातळीवरही उदासीनता दिसत आहे.
....
कोट
सदस्य, पदाधिकारी यांची नावे सांगून आतापर्यंत प्रशासनाने वेळ मारून नेली आहे. मात्र आता प्रशासकीय कारभार सुरू आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहेत. त्यांनी तीन महिन्यांत काय वेगळे काम केले, हे जाहीर करावे. एकही काम समाधानकारक नाही. फक्त बदल्या करणे आणि एकमेकांच्या खोडी काढण्याचे काम न करता दिशाशर्दक काम करून दाखवावे. पुढील आठवड्यात आतापर्यंत काय निर्णय घेतले व पुढे काय करणार आहेत, याबाबत शिष्टमंडळाच्या माध्यमातून भेट घेणार आहे.
-उमेश आपटे, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64252 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..