
हायवेला पावसाळ्यानंतरचा मुहूर्त!
हायवेला पावसाळ्यानंतरचा मुहूर्त!
संकेश्वर-आंबोली मार्ग; कंपनीचा सर्व्हे अंतिम टप्प्यात, प्लँटसाठी जागा पाहणी
अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २० : संकेश्वर ते आंबोली पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला आता पावसाळ्यानंतरचा मुहूर्त मिळणार आहे. हायवेचे काम घेतलेल्या राजस्थानच्या ठेकेदार कंपनीकडून सुरू असणारा सर्व्हे अंतिम टप्प्यात आहे. वेगवेगळ्या प्लँटसाठी कंपनीकडून जागेची चाचपणीही सुरू झाली असून, दोन ठिकाणी जागा निश्चित केल्याचेही सांगण्यात येते.
एकूण पाचशे कोटींच्या या प्रकल्पाचे काम राजस्थानच्या कंपनीला मिळाले आहे. महामार्ग प्राधिकरणाकडून मिळालेल्या इस्टिमेटच्या अनुषंगाने कंपनी स्वत:च्या यंत्रणेद्वारे पुन्हा एकदा सर्व्हेचे काम हाती घेतले आहे. हे काम ९० टक्क्यापर्यंत पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. सर्व्हेनंतर कंपनी स्वत:हून रस्त्याचे डिझाईन तयार करून मंजुरीसाठी महामार्ग प्राधीकरणाकडे सादर करणार आहे. याशिवाय कंपनीकडून रस्ता कामासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी विविध ठिकाणी प्लँट उभारले जाणार आहेत. त्यासाठीच्या जागेची चाचपणीही सुरू असून, आतापर्यंत दोन जागा निश्चित झाल्याचे सांगण्यात येते. नव्या रस्ता कामाची सुरुवात संकेश्वर की आंबोलीपासून होणार, याचे नियोजन अद्याप कंपनीने प्राधिकरणाकडे दिले नसल्याचे सांगण्यात येते; परंतु कंपनीचा अंतिम सर्व्हे, महामार्गाचे डिझाईन सादर झाल्यानंतरच प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार आहे. यात पावसाळ्याचा कालावधी जाणार आहे.
गडहिंग्लज व आजरा तालुक्याच्या दृष्टीने या मार्गाला विशेष महत्त्व आहे. या दोन्ही तालुक्यांच्या कार्यक्षेत्रातून पुढे आंबोलीला जाणाऱ्या हायवेबद्दल विविध व्यावसायिकांना मोठी उत्सुकता आहे. दुपदरी असलेल्या या हायवेमध्ये सरसकट भूसंपादन होणार नाही. केवळ वळण काढतानाच आवश्यक भूसंपादन होणार आहे. यामुळे रस्त्याकडील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. अनेक वर्षांपासून हा हायवे चर्चेत आहे. रस्त्याकडेला घर बांधकाम करताना आधी हायवेचा विचार नागरिकांच्या मनात येतो; परंतु आता दुपदरी हायवेसाठी जमीन संपादनाचा मुद्दा नसल्याने घर बांधकाम केलेले निवांत झाल्याचे चित्र आहे. घर बांधकामाचा नियोजन असणाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला संपर्क साधत रस्त्यापासून किती अंतरावर घर बांधावे, याचा सल्ला विचारताना दिसत आहेत.
चौकट...
दृष्टिक्षेपात हायवे...
- हायवेमुळे तासात आंबोली, दीड तासात गोवा
- छोट्या-मोठ्या व्यवसायांना मिळणार चालना
- गडहिंग्लज, आजरा शहरातूनच जाणार
- लांबी ६५ कि.मी. व १० मीटर रुंदीच्या हायवेसाठी ५०० कोटी
- ऐतिहासिक व्हिक्टोरिया पुलाला होणार नवा समांतर पूल
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69631 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..