
एसटी महामंडळ
एसटी मुक्कामी गाड्यांच्या फेऱ्या कमी
१५ लाखांच्या महसुलाला फटका; ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय
शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ ः एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पाच महिने लावून धरलेला संप, इंधन दरवाढ, वाहतूक नियोजनाचा अभाव, खासगी वाहतूकदारांनी खेचून घेतलेला एसटी प्रवासी वर्ग या साऱ्यातून जिल्ह्यातील दीडशेहून अधिक रात्र मुक्कामी एसटी गाड्यांच्या फेऱ्या कमी झाल्या आहेत. यातून एसटी महामंडळाला जिल्ह्यात दरमहा बारा ते पंधरा लाखांच्या तर राज्यात एक कोटीच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. अशा स्थितीत एसटीने गमावलेला प्रवासी वर्ग परत मिळविण्यासाठी प्रवाशांना खात्रीशीर व सुरक्षीत प्रवासी वाहतूक देण्यासाठी एसटी महामंडळाला प्रयत्न करावे लागणार आहेत.
कोल्हापुरातील जवळपास ११ आगारांतून ग्रामीण भागात तसेच शहरीभागात रोजची प्रवासी सेवा दिली जाते. यात एका पंचक्रोशीत जवळपास दोन ते चार गाड्या रात्रीच्या मुक्कामासाठी पाठवल्या जात होत्या. त्याऐवजी सध्या ज्या गावात दोन गाड्या रात्र मुक्कामी होत्या. त्यापैकी एकच गाडी पाठवली जात आहे. त्यामुळे रात्र मुक्कामाच्या एकूण दीडशेवर फेऱ्या कमी झाल्या. एक गाडी त्याशिवाय ज्या गावांना दिवसाला तीन फेऱ्या होत होत्या. त्याऐवजी सध्या दोनच फेऱ्या होत आहेत. त्यामुळे बहुतांशी गावात सकाळी व सायंकाळी अशा दोनच गाड्यांची सेवा मिळते. परिणामी दिवसभराच्या मधल्या वेळेत खासगी वाहतुकीच्या गाडीतून ग्रामस्थ प्रवास करत आहेत. त्यामुळे एसटीचा हक्काचा महसूल खासगी वाहतुकीकडे गेला आहे. कोल्हापुरातच नव्हे तर राज्यभरात अशी स्थिती आहे. राज्यात एकूण १ हजारांहून अधिक रात्र मुक्कामाच्या गाड्याच्या फेऱ्या कमी झाल्या आहेत.
एसटी महामंडळास एका फेरीसाठी २९ रुपये परकिलो मीटरचा खर्च आहे. यात डिझेल दर वाढल्याने ९४ रुपये एक किलो मीटरसाठी एसटीला मोजावे लागतात. यात रात्र मुक्कामी गाड्यातील प्रवासी वर्ग कमी झाल्याने खर्चाएवढा महसूल एसटीला मिळत नाही. रात्र मुक्कामी गाड्यात अनेकदा अवघे पंधरा वीस प्रवासी असतात. एसटी बस त्यागावाला चालविणे शक्य होत नाही. परिणामी दोन ऐवजी एकच गाडी सोडली जात आहे, अशी माहिती वाहतूक विभागाने दिली. यात तथ्य जरूर आहे.
याच वेळी कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकावरून कोल्हापूर पुण्यासाठी दर पंधरा ते वीस मिनिटाला एक गाडी सोडली जाते. पुण्यासाठी गाड्या सारख्या असल्याने एक गाडी जेमतेम पंधरा वीस प्रवाशांवर पुण्यापर्यंत नेली जाते. त्याऐवजी अर्धा तासाला एक गाडी सोडल्यास एका गाडीतून चाळीस ते पन्नास प्रवाशांची वाहतूक होऊ शकेल.
चौकट
एसटी महामंडळाने दुर्गम वाडीवस्तीवर रात्र मुक्कामी गाड्या सोडून प्रवाशांची सोय केली. मध्यंतरीच्या काळात कोरोना किंवा अन्य कारणांनी ही सेवा थांबली तेव्हा याच गावातील प्रवास खासगी वाहतुकीकडे वळले. मात्र एसटीची सुरक्षित सेवेचे महत्त्व विचारात घेऊन गावागावांतील लोकांनी एसटीने सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घेतल्यास रात्र मुक्कामी गाड्यांना पुन्हा एकदा प्रवासी वर्ग वाढेल. एसटीला महसूल व प्रवाशांना शाश्वत सेवा मिळेल.
-उत्तम पाटील, पश्चिम महराष्ट्र अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79884 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..