इचलकरंजीत पाणी प्रश्न होणार संवेदनशील

इचलकरंजीत पाणी प्रश्न होणार संवेदनशील

इचलकरंजीत पाणी प्रश्न होणार संवेदनशील
महापालिका प्रशासनाला धास्ती; उन्हाळ्यात लागणार कस, कृष्णेची गळती, पंचगंगेचे प्रदूषण डोकेदुखी

पंडित कोंडेकर ः सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १३ ः शहरातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने आगामी उन्हाळा महापालिका प्रशासनासाठी कसरतीचा ठरण्याची चिन्हे आहेत. कृष्णा योजनेला सातत्याने लागणारी गळती आणि आतापासूनच पंचगंगा नदी प्रदूषणाचा निर्माण झालेला गंभीर प्रश्न यामुळे पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातच महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक तोंडावर आहे. परिणामी, या काळात शहरातील पाणीप्रश्न संवेदनशील होण्याची भीती आहे. त्यामुळे महापालिका प्रश्न आतापासूनच धास्तावले आहेत.
शहराला कृष्णा नदीतून बहुतांशी पाणीपुरवठा केला जातो. ही योजना कालबाह्य झाली आहे. त्यामुळे या योजनेकडील जलवाहिनीसह यंत्रसामुग्री सातत्याने बदलण्याची वेळ येत आहे. गळतीचा प्रश्न पाचवीला पूजला आहे. जलवाहिनी खराब झाल्यामुळे पूर्ण क्षमतेने पाणी उपसा करण्यावर मर्यादा पडत आहेत. त्यामुळे पंचगंगा योजनेचा आधार घ्यावा लागतो. कृष्णा आणि पंचगंगा या दोन्ही योजनांतून पाणी उपलब्ध झाले तर एक दिवस आड पाणीपुरवठा करता येतो. पण सातत्याने जलवाहिनी गळती, वीजपुरवठा खंडित, यंत्र सामुग्री नादुरुस्त यामुळे शहरातील पाणीपुरवठा सातत्याने विस्कळीत होतो.
---
प्रशासनाची कसरत
सध्या पंचगंगा नदी प्रदूषित आहे. त्यामुळे महापालिकेने उपसा बंद ठेवला आहे. कृष्णा योजनेला आमराई रोडवर गळती लागली आहे. ही गळती तातडीने काढण्यावर मर्यादा आल्या आहेत. पंचगंगा नदीतून उपसा बंद असल्यामुळे व गळती काढण्याचे काम वेळेत न झाल्यास शहरात भीषण पाणी टंचाई होण्याची भीती आहे. त्यामुळे अशा कठीण परिस्थितीत महापालिका प्रशासनाची कसरत होत आहे.

पंचगंगा प्रदूषणाचा फटका
अनेक वेळा अत्यंत जुन्या असलेल्या पंचगंगा योजनेवरच महापालिका प्रशासनाला भिस्त ठेवावी लागते; पण यंदा पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा गंभीर बनला आहे. उन्हाळ्यात प्रदूषणाची तीव्रता वाढते. त्यामुळे उपसा बंद ठेवल्यास या योजनेतून दररोज नऊ एमएलडी मिळणारे पाणी थांबणार आहे. त्याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर होणार आहे.
-----------
२२ कोटींचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
कृष्णा योजनेची उर्वरित जलवाहिनी बदलणे आवश्यक आहे. त्यामुळे गळतीच्या संकटातून मुक्तता होणार आहे. सुमारे २२ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. त्याच्या मंजुरीसाठी पाठपुरावा आवश्यक आहे. या निधीतून साडेपाच किमीची उर्वरित जलवाहिनी बदलण्यात येणार आहे. यामध्ये मजरेवाडी उपसा केंद्र ते कुरुंदवाड (दीड किलोमीटर), शिरढोण ते टाकवडे (दीड किलोमिटर) आणि आमराई रोड ओढा ते जलशुद्धीकरण केंद्र (सव्वा दोन किलोमीटर) या मार्गाचा समावेश आहे.
-------------
पुढच्या वर्षी उन्हाळा सुसह्य
दूधगंगा योजना मार्गी लागण्यास विलंब लागणार आहे. त्यामुळे तूर्तास कृष्णा योजनेवरच भिस्त राहणार आहे. सुमारे साडेतीन लाख लोकसंख्येच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न असणार आहे. कृष्णा योजनेची उर्वरित जलवाहिनी बदलण्यास अद्याप पुरेसा कालावधी लागणार आहे. ही योजना तातडीने मंजूर झाल्यास काम पूर्णत्वास जाण्यासाठी वर्षभराचा कालावधी जाऊ शकतो. त्यामुळे कदाचित येणारा नव्हे, तर पुढचा उन्हाळा सुसह्य होऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com