
माथाडींचे निलंबन
४०० माथाडीवर निलंबन कारवाई करा
जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; मार्केट यार्डात गूळ सौदे ठप्प, बैठकीतील चर्चा निष्फळ
कोल्हापूर, ता. ७ ः मजुरीत वाढ द्यावी तसेच नवीन माथाडी करार करावा यासह विविध मागण्यांवर माथाडी कामगार अडून बसले आहेत. त्यांनी आजही गूळ बाजारपेठेत काम करण्यास नकार दिला. याची दखल घेत शेती उत्पन्न बाजार समितीने ४०० माथाडी कामगारांना निलंबन कारवाई करण्याची नोटीस बजावली आहे. दरम्यान, उशिरा काम बंद करणाऱ्या शाहू मार्केट यार्डातील माथाडींवर निलंबनाची कारवाई करावी, असा आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बाजार समितीच्या सचिवांना आज दिला.
बाजारपेठेत १५ हजार गुळाची आवक आहे. सौदे होत आहेत. माथाडी कामगार मजूरीवाढीवर अडून बसल्याने कामावर आले नाहीत. गूळ उतरूणे, थप्पी लावणे, तोलाई, पॅकिंग करणे, सौदे झालेला गुळ रवे ट्रकमध्ये भरणे अशी कामे ठप्प झाली. बाजार समितीच्या प्रशासक व सचिव जयवंत पाटील यांनी माथाडी व व्यापाऱ्यांची बैठक घेतली. माथाडी कामगारांना कामानुसार कमीत ३ ते ८ रूपये मजूरी आहे. यातही वाढ द्यावी अशी मागणी केली. व्यापाऱ्यांनी राज्यात कोल्हापूरात सर्वाधिक मजूरी दिली जाते. यापेक्षा जास्त मजूरीवाढ देणे अशक्य असल्याचे स्पष्ठ केल्यानंतर माथाडी कामगार निघून गेले. सायंकाळपर्यंत माथाडी कामगार कामावर आले नाहीत. त्यामुळे व्यापारी, शेतकरऱ्यांना वेठीस धरत नुकसान केले. याबाबत निलंबन का करू नये, अशा आशयाची नोटीस ४०० माथाडींना बजावली.
माथाडीची घेतली टोकाची भूमिका
मागील महिन्यात कामगारांनी पाच दिवस काम बंद आंदोलन केले. बाजार समिती सचिव, सहकार निबंधक व निवासी जिल्हाधिकारी यांनी माथाडीनी टोकाची भूमिका न घेता काम सुरू ठेवून मागणीवर चर्चा करावी असे आवाहन केले होते, तरीही माथाडीनी माघार घेतली नव्हती. त्यानंतर निलंबनाचा इशारा दिल्यानंतर काम सुरू केले होते. जेमतेम २६ दिवस काम झाले. त्यानंतर पून्हा सोमवारी सहकार निबंधकांची भेट घेत मजूरीवाढीची मागणी मान्य न झाल्याने माथाडी कामगार काम बंद करून गावी गेले. त्यामुळे आज दुसऱ्या दिवशी गूळ सौदे झाले नाहीत.
ः----------------------------
चौकट
निलंबन कारवाईचे आदेश
कोल्हापूर : मजुरी वाढीच्या मागणीसाठी अचानक काम बंद करणाऱ्या शाहू मार्केट यार्डातील माथाडींवर निलंबनाची कारवाई करावी, असा आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बाजार समितीच्या सचिवांना आज दिला. माथाडींच्या नेत्यांनी सौदे स्थळी येऊ नये, यासाठी १४४ कलम लावले जाईल, असेही स्पष्ट केले. आज सायंकाळी याविषयावर बैठक झाली. श्री. रेखावार यांनी बंद पडलेले गूळ सौदे तातडीने सुरू करावेत, बाहेरच्या बाजार समितीमधून माथाडी कामगारांचे ज्यादा मनुष्यबळ घ्यावे, सौदेस्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, गुळाच्या पॅकिंगसाठी शिवणकाम करणाऱ्या महिला व पुरुष कामगारांना शक्य तिथे तातडीने कामे द्यावीत, अशा सूचना केल्या.