महान भारताच्या रचनेसाठी संपूर्ण विजय आवश्यक ः अमित शहा

महान भारताच्या रचनेसाठी संपूर्ण विजय आवश्यक ः अमित शहा

८३९७१
कोल्हापूर : भारतीय जनता पक्षातर्फे येथे रविवारी झालेल्या विजय संकल्प रॅलीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)

वाढावा फोटो
83968
कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी भारतीय जनता पक्षाच्या विजय रॅलीत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्या वेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, समरजितसिंह घाटगे, खासदार धैर्यशील माने, प्रकाश आवाडे, अमल महाडिक, सुरेश हाळवणकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुरेश खाडे, महेश जाधव, खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार विनय कोरे, गोपीचंद पडळकर. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)


‘एनडीए’ सरकारच करेल भारताला महान
---
विजय संकल्प रॅलीद्वारे केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी फुंकले रणशिंग
---
महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युती सर्व ४८ जागा जिंकेल

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षांत देशाला प्रगतिपथावर नेले. जगात भारत महासत्ता म्हणून पुढे येत आहे. आपल्याला आता महान भारताची रचना करावयाची आहे. ते कार्य ‘एनडीए’च करेल, असा दावा करीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज येथे विजय संकल्प रॅलीत रणशिंग फुंकले. ते म्हणाले, ‘‘२०२४ च्या निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष-शिवसेना युती सर्व ४८ जागांवर विजय मिळवेल. जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा आणि विधानसभेच्या सर्व जागांवर भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार विजयी झाले पाहिजेत. त्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहनही श्री. शहा यांनी या वेळी केले. त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढविण्याचे संकेतही त्यांनी या वेळी दिले.
नागाळा पार्क येथे भाजपच्या जिल्हा कार्यालयाचे काम सुरू आहे. कार्यालय आवारातील गणेश मंदिराचे भूमिपूजन मंत्री शहा यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आयोजित विजय संकल्प रॅलीत त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये संसदेच्या सभागृहात भाषण केले. त्यात त्यांनी हे सरकार गोरगरीब आणि वंचितांचे असल्याचे म्हटले होते. ते भाषण दिशादर्शक होते. गेल्या नऊ वर्षांत देशातील १० कोटी घरात गॅस पोचला. सर्व गावांत वीज पोचली. ११ कोटी घरांत स्वच्छतागृहे झाली. ८० कोटी लोकांना आरोग्य सुविधांचा लाभ मिळाला. कोरोना काळात १३० कोटी लोकांना दोन्ही डोस मोफत मिळाले. ८० कोटी लोक तीन वर्षांपासून प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य मोफत घेत आहेत. सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून श्री. मोदी यांनी जागतिक स्तरावर दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिले. काशी, उज्जैन, केदारनाथ, बद्रिनाथ येथील मंदिरांचे विस्तारीकरण करून त्यांनी सांस्कृतिक वारसा जपला. आत्मनिर्भर भारत बनविला. एक थेंब रक्त न सांडता काश्मीरमधील कलम ३७० रद्द केले. अयोध्येत भव्य राममंदिराची उभारणी सुरू केली आहे. जागतिक स्तरावर आपली अर्थव्यवस्था ११ व्या स्थानावरून पाचव्या स्थानावर आली आहे. सर्वच क्षेत्रांत देश प्रगती करीत आहे. आता आपल्याला सत्ता मिळविण्यासाठी बहुमत नको तर महान भारताची रचना करण्यासाठी सत्ता हवी आहे. यासाठी राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा सेना-भाजप युतीने जिंकल्या पाहिजेत. जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही आणि विधानसभेच्या सर्व जागा युतीने जिंकून संपूर्ण विजय मिळविला पाहिजे.’’
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनोगत व्यक्त केले. खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षांत विकासाची दिशाच बदलली आहे. पूर्वी आपण पाश्चिमात्य जगाकडून विकासाची प्रेरणा घेत होतो; मात्र मोदी यांनी देशाला खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनविले. सहकारी साखर कारखान्यांचे १० हजार कोटींचा प्राप्तिकर रद्द केल्याने साखर उद्योगाला उभारी मिळाली आहे.’’ खासदार संजय मंडलिक म्हणाले, ‘‘काशी आणि उज्जैन येथे तीर्थक्षेत्र विकास आराखडा झाला; त्याचप्रमाणे अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्याचेही काम लवकर व्हावे. पंचगंगा प्रदूषण आराखड्याला निधी मिळावा. राजर्षी शाहू महाराज यांना भारतरत्न जाहीर करावा.’’
या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘२०१९ मध्ये लोकसभेच्या प्रचाराची सुरूवात कोल्हापुरातून केली. भाजप, शिवसेनेच्या युतीच्या ४२ जागा आल्या. विधानसभेतही विजय मिळविला; पण दुर्दैवाने संबंधांपेक्षा खुर्ची महत्त्वाची ठरली. तिच्या हव्यासातून काही लोकांनी २५ वर्षांची युती तोडली व विरोधकांसोबत संसार थाटला. २५ वर्षांत युतीत सडलो, असेही ते त्या वेळी म्हणाले; पण काळाचा महिमा बघा. असंगाशी संग केल्याने ते ज्यांच्यासोबत गेले त्यांनीच त्यांना अडीच वर्षांत संपविले व रस्त्यावर आणून ठेवले. आपल्याशी ज्यांनी बेईमानी केली होती, त्यांना त्यांची जागा दाखविण्याचे काम सहा महिन्यांपूर्वी केले. त्यांना असे चितपट केले की पुन्हा उठून उभे राहता येणार नाही.’’
या वेळी मंत्री सुरेश खाडे, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, विनय कोरे, प्रकाश आवाडे, माजी आमदार अमल महाडिक, सुरेश हाळणकर, शौमिका महाडिक, जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, राहुल चिकोडे, महेश जाधव, अशोक देसाई, विजय जाधव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पूर प्रस्ताव जागतिक बॅंकेकडे पाठविण्याचे काम सुरू
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘कोल्हापूर, सांगलीत सातत्याने येणाऱ्या पुरामुळे अवस्था वाईट होते. पुराचे पाणी शहरात येऊ नये म्हणून ते पाणी वळण बंधारे व बोगद्यांच्या माध्यमातून दुष्काळी भागाकडे नेण्याचा प्रकल्प प्रस्तावित आहे. हा प्रस्ताव तत्काळ राज्य सरकारने जागतिक बॅंकेला दिला. त्यांनी तत्त्वतः मान्यता देऊन याबाबत केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रस्ताव पाठवा; त्याला मान्यता देऊ, असे सांगितले आहे. त्यासाठी परिपूर्ण प्रस्तावाचे काम सुरू असून, लवकरच तो केंद्र सरकारकडे पाठविणार आहोत.’’

ते आता पाहुणे नसून घरचे
‘‘शिवसेनेचे खासदार असतानाही संजय मंडलिक व धैर्यशील माने या व्यासपीठावर आल्याने ते भाजपमध्ये आले का, अशी संदिग्धता निर्माण होऊ शकते; पण ते भाजप-शिवसेनेच्या युतीतून निवडून आले आहेत. त्यांची शिवसेना आता युतीतीलच आहे. तसेच, ही संकल्प रॅली २०२४ च्या लोकसभेसाठी असल्याने ते येथे आले आहेत. आता ते पाहुणे नाहीत तर घरचेच आहेत,’’ असा खुलासा उच्चशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रास्ताविकात केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com