
ॲड. पानसरे जवाब दो आंदोलन
84077
....
पानसरे स्मृतिजागर समितीचा
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
कोल्हापूर, ता. २०: कामगार नेते गोविंद पानसरे यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, याला आठ वर्षे पूर्ण झाली. तरीही शासनाला मूळ खुन्यांपर्यंत पोहचता आलेले नाही. त्यामुळे गृहमंत्री अमित शहा जवाब दो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जवाब दो, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जवाब दो, भाजप सरकार मुर्दाबाद, आरएसएस मुर्दाबाद, अशा जोरदार घोषणा देत कॉ. गोविंद पानसरे स्मृतिजागर समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शन करून प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, पानसरे यांच्या हत्येच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त ‘जवाब दो’ आंदोलन छेडले आहे. कोल्हापूरमध्ये पानसरे यांच्या घरासमोरच त्यांची हत्या झाली. या हत्येचा तपास दहशतवाद विरोधी पथक करत आहे. याचा खटला कोल्हापूर येथील सत्र न्यायालयात सुरू होणार आहे. दरम्यान, डॉ. नरेंद्र दाभोलकर, प्रा. एम. एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांचा खून करून पसार झालेल्यांचा शोध घेतला जात नाही. याला सरकार जबाबदार आहे. सरकार अशा लोकांना पाठीशी घालत आहेत. पानसरे यांच्या खुनाचे प्रकरण म्हणजे राज्याची प्रतिमा आणि प्रतिष्ठा देशातील भीषण घडामोडी स्पष्ट करत आहेत.
या वेळी भाकपचे सचिव भालचंद्र कानगो, सुभाष लांडे, अतुल दिघे, डॉ. मेघा पानसरे, उदय नारकर, दिलीप पवार, सतीशचंद्र कांबळे, एस. बी. पाटील, सुभाष जाधव, बाबूराव कदम उपस्थित होते.
‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिवशी संपूर्ण शहर बंद ठेवले होते. लोकांना शिवजयंती उत्साहात साजरी करायची होती. पण केवळ त्यांच्या दौऱ्यामुळे ती करता आली नाही’, असा आरोप भाकपचे राज्य सचिव सुभाष लांडे यांनी केला.