
राजाराम हरकती
`राजाराम’च्या ‘त्या’ सभासदांवर पुन्हा आक्षेप
हरकत दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस ः न्यायालयाचे निर्देश ठरणार महत्त्वाचे
कोल्हापूर, ता. २१ ः कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत यापूर्वी अपात्र ठरवलेल्या पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार फेरचौकशी सुरू असलेल्या सभासदांविरोधातच पुन्हा एकदा विरोधी गटाकडून हरकत दाखल करण्यात आली आहे. उद्या (ता. २२) या यादीवर हरकत दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे.
‘राजाराम’च्या प्रारूप मतदार यादीवर हरकत दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत सात हरकती दाखल झाल्या आहेत. कारखान्याची अंतिम मतदार यादी ९ मार्च रोजी प्रसिद्ध होणार आहे. यापूर्वीही या कारखान्याच्या मतदार यादीचा कार्यक्रम पूर्ण झाला होता. त्यात कारखान्याचे १३९९ सभासद चौकशीत तत्कालीन प्रादेशिक साखर सहसंचालकांनी अपात्र ठरवले होते. या निर्णयाला सहकार मंत्री व उच्च न्यायालयात सत्तारूढ गटाने आव्हान दिले होते, पण या दोन्ही ठिकाणी निर्णय कायम ठेवण्यात आला. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सत्तारूढ गटाने सर्वोच न्यायालयात दाद मागितली. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी अपात्र ठरवलेल्या सर्वच सभासदांची फेरचौकशी करून सहा महिन्यांत त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ‘राजाराम’ची प्रारूप यादी १३ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्यावर २२ फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत दाखल झालेल्या हरकतीत यापूर्वी अपात्र ठरवलेल्या १३९९ सभासदांविषयीची हरकत पुन्हा दाखल झाली आहे. यावर प्रादेशिक साखर सहसंचालकांचा होणार निर्णय व त्याविरोधात सत्तारूढ व विरोधकांची पुढची प्रक्रिया काय असेल यावर ‘राजाराम’च्या निवडणुकीचा फैसला अवलंबून आहे.