समरजीत घाटगे प्रेस कॉन्फरन्स

समरजीत घाटगे प्रेस कॉन्फरन्स

४० हजार सभासदांचे
४० कोटी गेले कोठे?

भाजप जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांचा सवाल

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २५ ः ‘सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात ४० हजार शेतकरी सभासद असल्याचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. प्रत्यक्षात त्यांनी कंपनी रजिस्ट्रेशनला दिलेल्या स्टेटमेंटमध्ये केवळ १७ सभासद आहेत. त्यामध्ये बहुतांशी सभासद हे त्यांचे कुटुंबीय आहेत. तर काही दिवाळखोर कंपन्या आहेत. त्यामुळे मुश्रीफांनी सांगितलेले ४० हजार सभासद आणि त्यांचे ४० कोटी रुपयांचे भागभांडवल गेले कोठे? याचा खुलासा मुश्रीफांनी केला पाहिजे. या संदर्भातील सर्व कागदपत्रे सक्त वसुली संचलनालय (ईडी) विभागाला पाठवणार आहे’, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी दिला. आज त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या वेळी घाटगे म्हणाले, ‘‘सरसेनापती घोरपडे साखर कारखान्याचे सभासद करून देतो असे सांगून शेतकऱ्यांकडून भागभांडवल गोळा करण्यात आले. माजी मंत्री हसन श्रीफ यांच्या सांगण्यानुसार घोरपडे साखर कारखान्याचे ४० हजार सभासद आहेत. त्यांच्याकडून प्रत्येकी १० हजार रुपयांचे भागभांडवल गोळा करण्यात आले आहे. त्यानुसार सुमारे ४० कोटी रुपयांची ही रक्कम आहे. मात्र प्रत्यक्षात सरसेनापती घोरपडे साखर कारखान्याच्या स्टेटमेंटमध्ये केवळ १७ सभासदांचीच नावे आहेत. यामध्ये सर्व व्यक्ती या मुश्रीफ यांच्या कुटुंबातील आहेत. तर काही दिवाळखोर कंपन्यांचे भाग भांडवल देखील आहे. भागभांडवलाची रक्कम सुमारे ९४ कोटी ३७ लाख ९३ हजार ५०० इतकी आहे. मग यामध्ये ४० हजार शेतकरी कोठे आहेत? कारखान्याच्या स्टेटमेंटमध्ये या भागभांडवलधारकांची नावे का नाहीत? यातील काही सभासदांना शेअर खरेदी केल्याच्या पावत्या दिल्या आहेत. त्या पावत्या खोट्या आहेत का? प्रत्यक्षात कारखान्याच्या बॅलेन्सशिट व शेअर स्टेटमेंटमध्ये हे पैसे कोठेच दिसत नाहीत. याचा अर्थ ४० हजार शेतकरी सभासद असल्याचे मुश्रीफ खोटे सांगत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांकडून भागभांडवल गोळा करून त्यांची फसवणूक केली आहे. फसवणुकीची जाणीव झाल्याने १६ शेतकऱ्यांनी धाडसाने पुढे येऊन मुश्रीफांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दिली. त्यामुळे मुश्रीफांवर गुन्हा दाखल करण्यात आला. फसवणूक झालेले आणखी शेतकरी आहेत त्यांनी धाडसाने पुढे यावे.’’
-----

वार्षिक अहवाल कुठे?
या वेळी समरजित घाटगे म्हणाले, ‘‘शाहू कारखान्याच्या कर्जासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. ‘शाहू’च्या ताळेबंदाचा अहवाल सर्व सभासदांना दिला आहे. त्यामुळे सर्वच माहिती आहे. पण असा ताळेबंदाचा अहवाल सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचा आहे का? त्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा तरी झाली का? त्यामध्ये ४० हजार शेतकरी सभासद आले होते का? याचे पुरावे त्यांनी द्यावेत.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com