
कळंबा आठ जणांवर गुन्हा दाखल
मारहाण प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
कोल्हापूर ः कळंबा येथील कात्यायनी कॉम्प्लेक्समध्ये सोमवारी (ता. २७) रात्री झालेल्या मारामारीत आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पार्टीसाठी दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून वाद होऊन आठ जणांनी दोन भावांवर चाकू, तलवार व काठीने हल्ला केला. यात सख्खे भाऊ गंभीर जखमी झाले. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली. जखमी विजय राजेंद्र कांबळे याने करवीर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सांगितले, की वर्गणी काढून पार्टीचे नियोजन केले होते. या वेळी पार्टीला दिलेले पैसे परत मागण्यासाठी विजय कांबळे व त्याचा भाऊ अभिजित कांबळे हे दोघे कात्यायणी कॉम्प्लेक्स येथे गेले होते. तेथे संतोष रोकडे, ऋषीकेश रोकडे, तृप्ती रोकडे, साक्षी रोकडे, प्राची रोकडे, अरुणा रोकडे, विजू रोकडे, वसंत रोकडे यांनी तलवार, चाकू, लाकडी दांडक्याने हल्ला केला. यात विजय व अभिजित गंभीर जखमी झाले. हल्ला केल्यावर संशयित पळून गेले. जखमी बंधूंवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हेड कॉन्स्टेबल गुरव अधिक तपास करीत आहेत.