
धरणग्रस्तांनी होळी करून केला शासनाचा निषेध
87532
...
धरणग्रस्तांनी होळी करून केला सरकारचा निषेध
कोल्हापूर, ता. ७ ः कब्जेपट्टीच्या रक्कमेचा शासन आदेश रद्द करावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून धरणग्रस्तांनी बेमुदत ठिय्या आंदोलन पुकारले आहे. आज या आंदोलनाचा १० वा दिवस होता. दरम्यान, सोमवारी (ता.६) होळीचे औचित्य साधून धरणग्रस्तांनी प्रतिकात्मक होळी करून सरकारचा निषेध केला.
जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर धरणग्रस्तांचे १० दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. धरणग्रस्त स्त्रिया आणि पुरूष याच ठिकाणी बसून आहेत. याबाबतचे पत्रक श्रमिक मुक्ती दलाने प्रसिद्ध केले आहे. पत्रकातील माहितीनुसार, सोमवारी (ता.६) आमच्या आंदोलनाचा ९ वा दिवस होता. या दिवशी होळीचा सण असूनही प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे आम्हाला आंदोलनस्थळीच होळी साजरी करावी लागली. प्रकल्पग्रस्तांनी आपली घरेदारे, जमिनी राज्याच्या विकासासाठी दिली. पण प्रशासनाच्या धोरणामुळे आम्हाला येथेच होळी साजरी करण्याची वेळ आली, ही खेदाची बाब आहे. म्हणून आम्ही शासनाच्या विरोधात प्रतिकात्मक होळी केली. सर्वांनी शासनाच्या विरोधात शंखध्वनी केला. तसेच प्रशासनाला सुबुद्धी दे अशी देवाकडे प्रार्थना केली. दरम्यान ,होळीच्या दिवशी माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. प्रशासनाने आंदोलकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास शेतकरी संघटनेच्यावतीने चक्काजाम आंदोलन करू, असा इशारा शेट्टी यांनी दिला. तसेच धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचेही त्यांनी आश्वासन दिले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रविण यादव, ब्लॅक पँथरचे अध्यक्ष सुभाष देसाई, विश्वास कांबळे यांनीदेखील पाठिंबा व्यक्त केला.