
‘त्या निवडणूक निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
‘त्या’ निवडणूक निरीक्षकावर
गुन्हा दाखल करण्याची मागणी
---
आर्यक्षेत्रीय समाज ट्रस्ट प्रकरण; आयुक्तांना निवेदन
कोल्हापूर, ता. १० : निवडणूक निरीक्षक असीफ शेख यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवेदनद्वारे केली आहे. धर्मादाय आयुक्तांना मागणीचे निवेदन आज देण्यात आले. परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय करजगार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन दिले.
या निवेदनातील माहिती अशी, की आर्यक्षेत्रीय समाज पब्लिक ट्रस्ट या संस्थेची निवडणूक नुकतीच घेण्यात आली. धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानुसार निवडणूक निरीक्षक म्हणून श्री. शेख यांची नियुक्ती होती. त्यानुसार मतदान झाल्यावर त्याच दिवशी निकाल जाहीर झाला. यात एका पॅनेलला एकतर्फी विजयी घोषित करण्यात आले. एकूण झालेले मतदान व मोजलेल्या मतदानाचा ताळमेळ लागत नव्हता. त्यामुळे निकालाबाबत पराभूत झालेल्या पॅनलने तक्रार दाखल केली. त्यानंतर शेख यांनी नऊ महिन्यांनंतर संस्थेत निवडून आलेल्या पॅनलच्या ताब्यात असलेली मते घेऊन त्यांची फेर मतमोजणी केली. यात लपवून ठेवलेल्या मतांचे गठ्ठे मोजले व पुन्हा पहिल्याच पॅनेलला विजयी घोषित केले. तसेच, धर्मादाय आयुक्तांकडे लेखीपत्र देऊन मतमोजणीत आपल्याकडून चूक झाल्याचे शेख यांनी कबूल केले. या साऱ्यात शेख यांनी कर्तव्यात कसूर केली, तसेच एका संस्थेची मतांची मोजणी नऊ महिन्यांनी पुन्हा कशी केली, अशा शंका आहेत. म्हणून शेख यांच्या कारभाराची चौकशी करावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी. जयवंत सूर्यवंशी, रोहन निर्मळे, अमित पाटील, हेमंत मेहंदळे, संजय करजगार, रत्नदीप चोपडे, प्रकाश चव्हाण यांच्या शिष्टमंडळाने हे निवेदन दिले.