
संवाद-समन्वयातून मिळाला २२० ग्राहकांना न्याय
लोगो- जागतिक ग्राहक दिन
ग्राहक चळवळीने दिला
२२० जणांना न्याय
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ ः बाजारपेठेतील तीव्र स्पर्धा, महागाई, जागतिकीकरणाबरोबरच फसवणुकीचे प्रमाणही वाढले आहे. जिल्ह्यात वर्षभरात फसवणूक, अन्यायाविरोधात संवाद आणि समन्वयाच्या माध्यमातून ग्राहक चळवळीने देऊन २२० ग्राहकांना न्याय मिळवून दिला. अखिल भारतीय ग्राहक पंचायत कोल्हापूर महानगरने ही कामगिरी केली.
‘ग्राहक पंचायती’ची शहरात शिवाजी पेठ, सानेगुरुजी वसाहत, राजारामपुरी, कसबा बावडा येथे मार्गदर्शन केंद्रे आहेत. त्यांच्या माध्यमातून जानेवारी २०२२ ते फेब्रुवारी २०२३ अखेरपर्यंत एकूण २६५ जागरुक ग्राहकांच्या विविध स्वरूपातील तक्रारी दाखल झाल्या. त्यात विम्याची रक्कम उशिरा मिळणे, रेल्वे-एसटी-विमानाच्या तिकीट नोंदणी रद्दनंतर कमी आणि विलंबाने रक्कम मिळणे, फ्लॅटचा ताबा मिळाला नसणे, शाळेचे शुल्क भरूनही प्रवेश निश्चितीबाबत टाळाटाळ करणे आदी तक्रारींचा समावेश होता. त्यावर ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी या तक्रारींची पडताळणी करून संवाद, समन्यवातून २२० ग्राहकांच्या तक्रारींचे निराकारण केले. उर्वरित तक्रारी आयोगाकडे पाठविल्या.
चौकट
ग्राहकांनी काय करावे?
-खरेदी केलेल्या वस्तूत दोष आढळल्यास ती बदलून मागावी
-वस्तू किंवा सेवा यांचे मूल्य ५० रुपयांपेक्षा अधिक असल्याची त्याची पावती घ्यावी
-गॅरंटी, वॉरंटी यातील फरक समजून घेऊन त्याबाबतचे कार्ड तपशीलासह घ्यावे
-दर्जा पाहूनच वस्तूंची खरेदी करावी
-सार्वजनिक सेवा देणाऱ्या आस्थपनांमधील ग्राहक तक्रार नोंदवहीचा वापर करावा.
चौकट
सजग, जागरुक रहावे
ग्राहकांनी वस्तू खरेदी अथवा सेवेचे शुल्क आदा करताना सजग, जागरूक रहावे. कोणत्याही दबावाखाली पाऊल टाकू नये. ग्राहक संरक्षण कायदा २०१९ नुसार मिळालेले सुरक्षितता, माहिती मिळविणे, वस्तू निवडणे, तक्रार निवारण, ग्राहक शिक्षण, आरोग्यदायी पर्यावरण या अधिकारांचा वापर करावा. अन्याय, फसवणुकीविरोधात ग्राहक पंचायत, तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायत कोल्हापूर महानगरचे अध्यक्ष कमलाकर बुरांडे यांनी आज केले.