मार्च अखेर कामांचा खोळंबा

मार्च अखेर कामांचा खोळंबा

जिल्‍हा परिषद ... लोगो
...

मार्चअखेर कामांचा खोळंबा

कर्मचारी संपाचा परिणाम; आर्थिक वर्ष पुढे ढकलणार का?

सकाळ वृत्तसेवा

कोल्‍हापूर, ता.१८ : जिल्‍हा नियोजन मंडळाकडून निधी वितरणास झालेला विलंब आणि त्यातच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप, यामुळे मार्च अखेरच्या कामांचा खोळंबा झाला आहे. अनेक तालुक्यांतील विकासकामे पूर्ण झाली आहेत. मात्र, त्यांची मोजमाप पुस्‍तिकेत नोंद करणे (एम.बी.), सादर केलेली बिले अदा करणे अशी कामे खोळंबली आहेत. एकूणच नियोजनचा निधी मार्चअखेर खर्च होण्यात अनेक अडचणी आहेत. त्यामुळे अखर्चित निधी शासनाला परत जाणार की मार्चअखेरील खर्चास मुदतवाढ मिळणार, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
जुनी पेन्‍शन योजना लागू करावी, यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. जिल्‍हा परिषदेचे बहुतांश कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. आर्थिक वर्ष संपण्यास अवघे १२ दिवस राहिले आहेत. असे असताना कर्मचारी संपावर गेले आहेत. यातच जिल्‍हा नियोजनचे निधी वाटप करण्यास खूपच विलंब झाला आहे. अद्याप ५० टक्‍के निधीचे वितरणच झालेले नाही. या निधीचे वितरण करून मार्चअखेर खर्च करणे जवळपास अशक्य आहे. यातच संप सुरू असल्याने कर्मचारी कामावर कधी परतणार, याबाबत मोठी साशंकता आहे.
संप मिटण्याची तूर्तास शक्यता दिसत नाही. उलट सोमवारपासून कर्मचारी अधिक तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. असे झाले तर उपलब्‍ध निधी खर्च होणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे निधी खर्चास दोन महिने मुदतवाढ मिळेल, अशीही जिल्‍हा परिषदेत चर्चा सुरू आहे. मुदतवाढ मिळाली तरच काही प्रमाणात निधी खर्च होणार आहे, अन्यथा अखर्चित राहणारा मोठा निधी शासनाला परत पाठवावा लागणार आहे. याबाबत आता शासनस्‍तरावरून काय निर्णय होतो, यावरच जिल्‍ह्यातील विकास योजनांचे भवितव्य ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com