
सामानगड आगीची चौकशी करा
सामानगड आगीची चौकशी करा
---
नौकुड ग्रामपंचायतची मागणी; उपवनसंरक्षकांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १९ : किल्ले सामानगडावर लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले आहे. पशुपक्षी, वन्यजीवांचे जीवन धोक्यात आले. या आगीची सखोल चौकशी करावी, तसेच दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नौकुड ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आली आहे. वन विभागाच्या उपवनसंरक्षकांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.
किल्ले सामानगड, चिंचेवाडी, नौकुड, हासुरसासगिरी वनक्षेत्र येथे वन विकास महामंडळ २००७ पासून कार्यरत आहे. वृक्ष लागवडीखालील विशेष वनक्षेत्रावर त्यांचा अंमल आहे. पण, सतत बदली होणारे अधिकारी, काम करू शकणाऱ्या मजुरांची कमतरता व परिस्थितीचे नसणारे गांभीर्य यामुळे नोव्हेंबरमध्ये गावठाण व वनक्षेत्र यांच्यातील जाळपट्टे काढण्याकडे दुर्लक्ष केले आहे.
त्यामुळे मागील मार्चच्या पहिल्या आठवड्यात तीन वेळा आग लागली. यात मोठे नुकसान झाले. वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मात्र, याचा संपूर्ण आरोप शेतकऱ्यांवर लावला जातो. या आगीची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. सरपंच शुक्राचार्य चोथे यांची निवेदनावर सही आहे.