
पान एक-''मल्टिस्पेशालिटी''च्या जागेचा प्रश्न सुटणार
90740- दीपक केसरकर
मल्टिस्पेशालिटीच्या जागेचा प्रश्न सुटणार
दीपक केसरकर ः कबुलायतदार प्रश्न लवकरच मंत्रिमंडळात
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २२ ः येथील रखडलेला मल्टिस्पेशालिटीचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. त्यासाठी दोन पर्याय राजघराण्यासमोर ठेवले असून नुकतीच महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्याशी राणीसाहेब शुभदादेवी भोसले व युवराज लखमराजे भोसले यांची चर्चा झाली आहे. दोन्ही पर्यायांचा आराखडा लवकरच बांधकाम विभाग तयार करेल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
व्हिसीद्वारे आज पत्रकारांशी संवाद साधताना केसरकर म्हणाले, "शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी भूमिपूजन झालेले मल्टिस्पेशालिटी ज्या प्रश्नावरून रखडले आहे, त्यासंदर्भात नुकतीच मुंबई येथे महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्याशी राणीसाहेब शुभदादेवी भोसले व युवराज लखमराजे भोसले यांची चर्चा झाली. यामध्ये जमीन व जागेचा मोबदला असे दोन पर्याय आहेत. चर्चा सकारात्मक झाली. हा प्रश्न लवकरच निकाली लागेल. आंबोली, गेळे येथील कबुलायतदार गावकर प्रश्नाबाबत मंत्रिमंडळासमोर तशा प्रकारचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. पुढच्या आठवड्यात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. चौकुळ येथील लोकांचे या प्रश्नाबाबतचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी लवकरच त्यांना मुंबई येथे निमंत्रित करण्यात येणार आहे."
ते म्हणाले, "उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी जिल्हा रुग्णालय आणण्याचा प्रयत्न आहे. मंत्र्यांकडे तशी मागणीही केली; परंतु कुडाळ येथील बाल रुग्णालयाच्या ठिकाणी जिल्हा रुग्णालय आणण्यासाठी कोण प्रयत्न करत असेल, तर ते योग्य नाही. पूर्वी सावंतवाडीला जिल्हा रुग्णालय असल्याने येथे जिल्हा रुग्णालय होणे आवश्यक आहे. काही ठिकाणी डॉक्टरांकडून रुग्णांना व कर्मचाऱ्यांना चांगली वागणूक दिली जात नाही, अशा तक्रारी आल्या आहेत. याबाबत आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करणार असून कुठल्याही डॉक्टरकडून असे प्रकार झाल्यास त्यांची गय केली जाणार नाही. रुग्णालयांमध्ये औषध पुरवठा सुरळीत असावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी जिल्हा नियोजनमधून तरतूद करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. सरकारकडून खासगी शाळा चालविण्याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. त्या संदर्भात फक्त चर्चा झाली असून अद्यापही काहीच हालचाल नाही."
सरकार पडणार हे त्यांचे स्वप्नच
सरकार पडणार असे विरोधक म्हणत असले तरी शिंदे सरकार बहुमत मिळून सत्तेत आलेले आहे. त्यामुळे सरकार पडणार, हे त्यांचे स्वप्नच राहणार आहे. न्यायालयातही आम्हालाच न्याय मिळेल. त्यामुळे ज्या दिवशी हा निर्णय होईल, त्यादिवशी सर्वांची तोंडे गप्प होतील, असेही मंत्री केसरकर म्हणाले.