कोलमडल्या नियोजमाला अधिकारीच जबाबदार

कोलमडल्या नियोजमाला अधिकारीच जबाबदार

90974
कोल्हापूर : माजी नगरसेवकांनी जल अभियंता हर्षजित घाटगे यांना तब्बल दोन तास घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती केली.


कोलमडल्या नियोजमाला अधिकारीच जबाबदार
पाणीप्रश्‍नी अभियत्यांनी घेराओ; माजी नगरसेवक संतप्त, साडी चोळीचा आहेर करणार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर ता. २३ : शहरातील पाणीपुरवठा नियोजन कोलमडले आहे. याला अधिकारीच जबाबदार आहेत. गुरुवारी (ता. ३०) पर्यंत सुरळीत करावे. अन्यथा जल अभियत्यांसह सर्व कर्मचाऱ्यांना साडी चोळीचा आहेर केला जाईल. तसेच महापालिकेने पंप दुरुस्तीकरीता उर्वरित तीन कोटीचा स्वनिधी मंजूर केला नाहीतर माजी नगरसेवक रस्त्यावर भीकमांगो आंदोलन करतील, असा इशारा देत संतप्त माजी नगरसेवकांनी जल अभियंता हर्षजित घाटगे यांना तब्बल दोन तास घेराओ घातला.
शहराच्या सर्वच भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. तर काही भागात अत्यल्प होत आहे. याशिवाय एस.एस.सी बोर्ड, म्हाडा कॉलनीत रात्री बारानंतर मैलामिश्रीत पाणी येत आहे. लाईन बझार, राजारामपुरी, रायगड कॉलनी, मंगळवार पेठ, आझाद गल्ली, राजेंद्रनगर, अकबर मोहल्ला, सुभाषनगर आणि कळंबा फिल्टर हाऊस, परिसरातील नागरीक पाणी मिळत नाही म्हणून आमच्याकडे येऊन जाब विचारत आहेत. अनेक भागात रस्ता रोको आंदोलन होत आहे. संबंधित अधिकारी मात्र फोन घेत नाहीत, रात्रीच्यावेळी कोणते अधिकारी हजर असतात? शेजारच्या भागात सहा तास पाणी आणि आमच्या भागात दोन तास हा समतोल का? अशा प्रश्‍नांची सरबत्ती करत संतप्त माजी नगरसेवकांनी जलअभियंता हर्षजित घाटगे, शाखा अभियंता प्रिया पाटील, आदी अधिकारी कर्मचाऱ्यांना तब्बल दोन तास घेरावो घालून धारेवर धरले.
प्रत्येक प्रभागाला समानपणे चार तास पाणीपुरवठा झालाच पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावर जलअभियंता घाटगे यांनी अपुरा पाणीपुरवठ्याचा अहवाल वाचून दाखविला. त्यावर समाधान न झाल्याने माजी नगरसेवकांनी नियोजन राहुंदे ४० टक्के पाणी गळतीवर काय उपाय केला, यावर उत्तर द्या, असा आग्रह धरला. यावर जलअभियंता घाटगे यांनी तपासणी करून उपाय योजना त्वरीत करू, असे सांगितले. शिंगणापुर, बावडा येथील पंप हाऊसचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव देऊ गुरुवारपर्यंत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करू, असे आश्‍वासन दिले. त्यावर माजी नगरसेवकंनी येत्या गुरुवार (ता. ३०) पर्यंत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास सर्व अधिकाऱ्यांना साडी चोळीचा आहेर केला जाईल.  शिवाय पाणी पुरवठा दुरुस्ती देखभालीसाठी तीन कोटींचा स्वनिधी मंजूर केला नाहीतर शहरात भीकमांगो आंदोलन करून महापालिकेला पैसे जमा करून दिले जातील, असा इशारा दिला.
या वेळी शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण, आदील फरास, विनायक फाळके, माजी महापौर निलोफर आजरेकर, प्रज्ञा उत्तुरे, जय जाधव, सचिन पाटील, दुर्वास कदम, शांकी मगदूम, राजाराम गायकवाड, भूपाल शेटे, महेश उत्तुरे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com