चैत्र पाडवा महामेळावा

चैत्र पाडवा महामेळावा

91019

मराठा समाजाने भविष्यवेधी व्हावे
राजेंद्र कोंढरे; अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे चैत्र पाडवा महामेळावा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ : ज्ञानाची आस, गुणवत्तेचा विकास व व्यावसायिकतेचा ध्यास बाळगून मराठा समाजाने भविष्यवेधी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी आज येथे केले. कोल्हापूरचा मूळशी पॅटर्न करायचा नसेल तर येथील मराठा समाजाने किरकोळ भावाने जमिनीची विक्री करू नये, असेही त्यांनी सांगितले.
अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे आयोजित चैत्र पाडवा महामेळाव्यात ते बोलत होते. महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्याबद्दल त्यांचा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा पुतळा व फेटा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तुकाराम बँकेतर्फे मराठा भवनसाठी एक लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला. दसरा चौकातील मैदानावर त्याचे आयोजन केले होते.
श्री. कोंढरे म्हणाले, ‘ मराठा समाज सामाजिक न्यायाची भूमिका घेणारा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ४७ हजार ५०० एकर जमीन इथल्या मराठा समाजातील शेतकऱ्यांनी प्रति स्क्वेअर फूट वीस पैसे ते दोन रूपये चौदा पैसे दराने शासनाला विविध प्रकल्पांसाठी दिल्या आहेत. हा मराठ्यांचा त्याग नाही का? पाच ते दहा वर्षे एकच अभ्यासक्रम शिकविणाऱ्यांच्या पेन्शनचा विचार केला जातो. मात्र, शेतकऱ्यांचा केला जात नाही. पदवीचे शिक्षण घेणारा युवक आज आठ ते दहा हजार वेतनावर राबत आहे. त्यात कुटुंबाचा खर्चही भागत नाही. तरीही जगात भारी आम्ही कोल्हापुरी असाच डंका वाजवणार का?’
ते म्हणाले, ‘‘ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाला जात, धर्म कळत नाही. तिथे आपले स्थान काय हे महत्त्वाचे ठरते. शेकडो एकर जमिनी असणारा मराठा समाज अर्ध्या गुंठ्यावर आला आहे. मराठा समाज लँडलेस झाला आहे. कुळ कायद्यात कंपन्यांना काही वर्षांच्या अटींवर दिलेल्या जमिनी मूळ किंमतीत शेतकऱ्यांना देणे आवश्‍यक आहे. तशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करत आहोत. कारण शेतकऱ्यांना उठवण्याचे कायदे कोणी केले, हे तपासून पाहा. एकही मंत्री, नेता जमिनी विकू नका, असे सांगत नाही.’
राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, ‘‘आरक्षणासाठी लाल महाल ते दिल्लीतील लाल किल्ला धडक देण्याची आवश्‍यकता आहे. मराठ्यांना कर्ज नाकारणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँकांच्या दारात ढोल वाजविण्याची वेळ आली आहे. छत्रपती शिवरायांची कोणी बदनामी केली तर त्याचे दात घशात घालण्याची भूमिका घेऊ.’’ दसरा चौकातील मैदानाची ओळख यापुढे शाहूतीर्थ होईल, असेही ते म्हणाले. प्राचार्य शिवाजीराव भुकेले, जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, शिवाजी पाटील, शैलजा भोसले, मारूती मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते प्रकाश मरगाळे, माजी आमदार मनोहर किणेकर, व्ही. के. पाटील, डॉ. संदीप पाटील, प्रकाश पाटील, दीपक पाटील, राजू पाटील, अतुल पाटील उपस्थित होते. इंद्रजित माने यांनी स्वागत केले. उत्तम जाधव यांनी आभार मानले.
------------
चौकट
राजेंद्र कोंढरे म्हणतात...
- आरक्षणाच्या ताटातून मराठा समाज बाजूला
- बहुजन समाजात दरी निर्माण करण्याचे काम
- राज्यात ५० हजार एकर जागा शिक्षण सम्राटांकडे
- मराठा समाजाच्या भवनसाठी अर्धा एकर जागा का मिळत नाही?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com