
धरणग्रस्त आंदोलन धरणग्रस्त आंदोलन
प्रकल्पग्रस्तांबाबत धोरणात्मक
निर्णय घेतला जाणारःमारुती पाटील
कोल्हापूर, ता. २४ : प्रकल्पग्रस्तांना लवकरच दिलासा दिला जाणार असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली जाणार आहे. आज पंचविसाव्या दिवशी आंदोलन सुरूच होते. दरम्यान, राज्याच्या मुख्य सचिवांसोबत श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांची चर्चा झाली. यामध्ये प्रकल्पग्रस्तांचे धोरणात्मक प्रश्न सोडवले जातील, अशी ग्वाही सरकारच्यावतीने दिल्याचे मारुती पाटील यांनी सांगितले.
प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी पंचवीस दिवस आंदोलन करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांची मंत्रालयीन पातळीवर दखल घेतली जात नव्हती. प्रशासनाकडूनही आवश्यक आणि अपेक्षित माहिती दिली जात नसल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांकडून होत आहे. शासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे. लोकांचे अतोनात हाल होत असताना शासन याकडे कानाडोळा करत आहे. दरम्यान, आज मुख्य सचिवांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबतही चर्चा केली जाणार आहे. मंत्रालयीन पातळीवर सर्व प्रश्नांची सोडवणूक होईल. मात्र, जिल्हा पातळीवरील प्रश्नही सोडवले जावेत, अशी मागणी पाटील यांनी केली.