फसव्या प्रसिद्धी पत्रकांपासून सावधान

फसव्या प्रसिद्धी पत्रकांपासून सावधान

फसव्या प्रसिद्धी पत्रकांपासून सावधान
इचलकरंजीत पेव; अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची अंमलबजावणी आवश्यक

संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १० : जीवनातील मानसिक कष्ट, पती-पत्नी कलह, लग्न न जमणे, प्रेम विवाह, वशीकरण, संतान सुख, शिक्षणात हमखास यश, गंभीर आजार निवारण यासह कोणत्याही समस्या, दोष गॅरंटी देवून निवारण्यात येईल. त्यासाठी केवळ एक फोन करा व निश्चित व्हा. अशा प्रसिद्धी पत्रकांची संख्या इचलकरंजी शहरात वाढत आहे. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात असताना अशा प्रसिद्धीपत्रकांमुळे या कायद्याच्या अंलबजावणीबाबत शंका निर्माण होत आहे. सुखी जीवनाचे आमिष दाखवून लुटणाऱ्यांचा शोध घेवून कारवाई करण्याची गरज भासत आहे.
आजच्या वैज्ञानिक युगातही नागरिक अंधश्रद्धांच्या भुलथापांना बळी पडत आहेत. यामध्ये फसवणूक होणाऱ्या नागरिकांमध्ये सुशिक्षितांचे प्रमाण वाढत आहे. कमी कष्टात अधिक प्रगती, आर्थिक उत्पन्न, लग्न जमवणे या सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या हेरून यामध्ये विशेष प्राविण्य असल्याचे प्रसिद्धीपत्रक काढले जात आहे. ते उच्चशिक्षित असून ही केवळ नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी हे काम करीत असल्याचा बनाव करीत असतात. तसेच विविध उपाय सांगण्यासाठी कॉम्प्युटर, लॅपटॉप यांचा वापर करीत असल्याने नागरिकही त्यांच्या भूलथापांना बळी पडत आहेत. छापील पत्रकासोबत सोशल मीडियाचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यांच्याकडून होणारे दावे हे अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याविरोधात असले तरी त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने त्यांचे मनोबल वाढत आहे.
महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात आल्यापासून अनेक घटनांना आळा बसला. मात्र सध्या पुन्हा बुवाबाजी करणारे डोके वर काढताना दिसत आहेत. शहराच्या अनेक ठिकाणी फलक लावून आपण कोणकोणत्या समस्या मार्गी लावण्यात येईल, अशी प्रसिद्धी करण्यात येत आहे. अंधश्रध्देचे दावे करणाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक बनले आहे.
---------
शहरातील पदकी बंधूंनी आयुष्य वेचले
भूत उतरवणे, गुप्तधन, करणी भानामती, अघोरी कृत्य, नरबळी, जादुटोणा, करणी करते म्हणून वाळीत टाकणे, भूत पिशाच्चांच्या नावाने भीती पसरवणे, मंत्र तंत्र, या अंधश्रध्देविरोधात इचलकरंजी शहरातील पदकी बंधूंनी आयुष्य वेचले. त्याच शहरात अंधश्रध्देबाबत दावे होणे अशोभनीय आहे.
---------
भोंदू बुवा बाबांचा सुळसुळाट झाला आहे. त्यास टीव्हीवरील मालिका, फसवे विज्ञानाचे कार्यक्रम जबाबदार आहेत. वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अभाव यास कारणीभूत आहे. अशांवर कारवाई होण्यासाठी जादूटोणाविरोधी कायदा व्यापक होणे गरजेचे आहे.
-सुनील स्वामी, अंनिस संस्कृती कार्यवाह, महाराष्ट्र राज्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com