
सतेज पाटील प्रचार सांगता
97689
....
‘राजाराम’ महाराष्ट्रात पहिल्या पाचमध्ये आणू
सतेज पाटील : सभासदांना पाच ऐवजी सात किलो साखर देणार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ : ‘छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याला २०३२ मध्ये शंभर वर्षे पूर्ण होत आहेत, त्याआधीच राजाराम कारखाना महाराष्ट्रातील पहिल्या पाच कारखान्यात गणला जाईल, असे काम करुन दाखवणार असल्याचा शब्द आमदार सतेज पाटील यांनी आज सभासदांना दिला. याशिवाय, सभासदांना पाच किलोऐवजी ७ किलो साखर आणि दिवाळीलाही सात किलो साखर दिली देण्याची घोषणाही श्री पाटील यांनी केली. राजाराममध्ये आत्ता परिवर्तन झाले नाही तर हा कारखाना महाडिकांच्या घशात गेल्याशिवाय राहणार नाही, अशी टीकाही श्री. पाटील यांनी केली. कसबा बावडा येथे झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.
आमदार पाटील म्हणाले, ‘राजाराम हा कोल्हापुरातील सर्वात जुना आणि अस्मितेचा कारखाना आहे. सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या कारभारामुळे हा कारखाना मोडकळीस आला आहे. सभासदांनी अंगठी या चिन्हावर शिक्का मारुन परिवर्तन घडवावे. सत्ता आल्यानंतर पहिले प्राधान्य सभासदांना दिले जाईल. कर्जरत्न खासदार धनंजय महाडिक यांच्या भिमा कारखान्यावर ५९८ कोटी कर्ज आहे आणि हेच कर्जरत्न खासदार सहकार शिकवायला निघालेत.’
डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी. पाटील म्हणाले, ‘डी. वाय. पाटील कारखान्याच्या माध्यमातून सतेज पाटील यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कष्टाला चांगले दाम देण्याचे काम केले आहे. डी.वाय.पाटील समूहातील विविध संस्थांमधून गोरगरीबांना मोफत सेवा देण्याचे काम केले जाते. कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो तरुणांना रोजगार दिला आहे.’
कारखान्याचे माजी अध्यक्ष हरिष चौगले म्हणाले, ‘जादा दर देणारे कारखाने काटा मारतात, हे मुश्रीफांना विचारा म्हणणाऱ्या महादेवराव महाडिक यांनी याच मुद्दावर मुश्रीफांची माफी मागितली होती. कुंभी, वारणा, भोगावती हे कारखानेही महाडिकांच्या म्हणण्यानुसार काटा मारत नाहीत, पण चांगला दर देतात. असाच दर राजारामकडून सभासदांना मिळाला पाहिजे. ’ यावेळी आमदार ऋुतूराज पाटील, आमदार जयश्री जाधव, अंजना रेडेकर, बी. एच. पाटील, प्रकाश झिरंगे, मोहन सालपे, महेश चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी हिंदुराव ठोंबरे, शशिकांत पाटील-चुयेकर, जयसिंग ठाणेकर उपस्थित होते.
...
* कारखान्यात केलेला घोटाळ बाहेर येणार..
‘राजाराम कारखान्यामधील जुने साहित्ये कोठे गेले, साखरेची पोती कुठे जातात? याशिवाय इतर अपहार बाहेर येईल म्हणूनच पुन्हा एकदा महाडिकांना सत्ता हवी आहे. कारखान्यातील हा सर्व घोटाळा बाहेर काढल्यावर महाडिक कंपनीला तुरुंगात जावे लागले, म्हणूनच खालच्या पातळीवर जावून ते आपल्यावर टीका करत असल्याचेही आमदार पाटील यांनी नमूद केले. ‘महादेवराव महाडिक यांनी २८ वर्षात स्वत:चे काहीही उभे केले नाही. दुसऱ्यांनी चांगल्या चालवलेल्या संस्थांची फसवणूक करून लुबाडण्याशिवाय काहीही केलेले नाही. गोकुळमध्ये आनंदराव पाटील-चुयेकर यांना बाजूला करुन गोकुळ काढून घेतले हे सर्वात मोठे उदाहरण असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
...
*धनंजय महाडिक ‘कट्टप्पा’ होतील म्हणून..
‘आपला मुलगा अमल महाडिक लहान आहे. त्यामुळे महादेवराव महाडिक यांनी राजाराम कारखान्यात सत्ता असतानाही २५ वर्षात कारखान्याच्या एकाही कार्यक्रमाला खासदार धनंजय महाडिक यांना बोलावले नाही. कारण धनंजय महाडिक कट्टप्पा होवून आपल्याच पाठीत तलवार खुपसतील हीच भिती महादेवराव महाडिक यांना होती’, अशी टीका कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांनी केली.